
नांदेड – जिल्ह्यात अवैध धंद्यांना पोलीस अधिकाऱ्यांचेच पाठबळ मिळत आहे की काय असे चित्र निर्माण झाले आहे. यावर आता नियंत्रण आणण्यासाठी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची विशेष पथके मैदानात उतरली आहेत. चार दिवसात नांदेड इतवारा आणि बिलोली पोलीस ठाणे हद्दीत चालणाऱ्या दोन जुगार अड्डयावर धाडी टाकून कारवाई केली. बिलोलीत २ फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या कारवाईत रोख ३ लाखांसह एकूण १६ लाखांचा मुद्देमाल केला. ५ जणांविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. या कारवाईनंतर बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची रवानगी थेट नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईनंतर आता जिल्ह्यातील ठाणे प्रमुखांना एकप्रकारे इशाराच देण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आउट सुरू केले आहे. प्रारंभी या मोहिमेत नांदेड जिल्ह्यात अनेक कारवाया करण्यात आल्या. पुढे या ना त्या कारणांमुळे ठाणे प्रमुखांनी या कारवायांकडे दुर्लक्ष केले. अनेक ठिकाणी अवैध धंदे बोकाळले. वाळू माफियांनीही जिल्हाभर हैदोस घातला आहे. भरदिवसा महाकाय बोटीद्वारे अवैधरित्या वाळू उपसा सुरूच आहे. यावर जिल्ह्यातील दोन सत्ताधारी खासदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तर जिथे अवैध वाळू उपसा सुरू आहे तिथे संबंधित पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांना जबाबदार धरून कारवाई करावी अशी सूचनाही केली. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्याचा विषय ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात जुगार अड्ड्यांसह नांदेड शहरातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत मटका सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारी पोलीस अधिक्षकांसह नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडेही केल्या जात आहेत. या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी उमापांची विशेष पथके आता मैदानात उतरले आहेत. नांदेड जिल्ह्यात ४ दिवसातच दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईनंतर बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना थेट नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले आहे.
ठाणे हद्दीतील अवैध धंदे रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत भोसले यांना नियंत्रण कक्षात पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या या कारवाईनंतर आता ठाणे प्रमुखांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पण त्याचवेळी ही कारवाई गोदाकाठच्या ठाणे प्रमुखांवर केली तशी अल्पकालीन ठरू नये, अशी चर्चाही पुढे आली आहे. गोदाकाठाप्रमाणेच मांजरा काठही आता सुजलाम् सुफलाम् झाला आहे.



