राजकीय

काँग्रेसचे शहजादे राहुल गांधींना वायनाडनंतर पुन्हा एकदा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

लोकसभा निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते एकमेकांचे कपडे फाडतील 

अनुराग पोवळे

नांदेड – काँग्रेसचे शहजादे वायनाड मतदारसंघात संकटात आहेत. येथे २६ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा एकदा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी नांदेडमध्ये केली. राहुल गांधींनी अमेठी सोडली आता वायनाड मतदारसंघही त्यांना सोडावा लागेल असेही मोदी म्हणाले.

नांदेड येथे आज २० एप्रिल रोजी भाजपाचे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोदी म्हणाले, देशात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी पार पडले. या पहिल्या टप्प्यात एनडीए आघाडीला एकतर्फी मतदान झाले. ही निवडणूक कोणाच्या हातात देश सुपूर्द करणार हे सांगणारी आहे. विरोधकांकडे कोणता नेता आहे अशी विचारणाही त्यांनी केली. विशेष म्हणजे निवडणुकांपूर्वीच काँग्रेसने हार स्वीकारली असल्याचे मोदी म्हणाले. लोकसभा निवडणूक लढण्याची काँग्रेसमध्ये हिम्मत उरली नाही. त्यांना उमेदवारही मिळत नाहीत. विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. मात्र २५ टक्के जागांवर या आघाडीतील उमेदवारच एकमेकाविरुद्ध लढत आहेत. हे उमेदवार यदाकदाचित निवडून आले तर संसदेतही असेच एकमेकांसमोर उभे राहतील. त्यामुळे यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडमध्ये निवडणूक लढवत आहेत.  वायनाडमध्ये त्यांना संकट दिसत असून अमेठीनंतर ते वायानाडही सोडतील असे ते म्हणाले. देशात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला मतदारांनी विकसित भारतासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गेल्या सहा दशकांच्या काळात काँग्रेसने गरीब, आदिवासी, दलित यांच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. आता भाजपाकडून गरीबांचा विकास केला जात असताना त्याचीही काँग्रेसकडून खिल्ली उडवली जात आहे. डिजिटल इंडिया, यूपीआय या साधनांचा गरीब कसे वापर करतील असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला होता. काँग्रेसने महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ या भागांचा विकास केला नाही. आजही मराठवाड्यातील लाखो युवक रोजगारासाठी स्थलांतर करतात. त्यामुळे या भागाचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ असे त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात ८० टक्के ‘नल से जल’ नागरिकांना मिळत आहे. अपर पैनगंगेवरील प्रकल्पाचे कामही सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १३०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. या भागातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारी, बाजरीसाठी श्री अन्न योजनेतून जगाचे लक्ष या पिकांकडे वेधले आहे. शक्तिपीठ एक्सप्रेस वे, समृद्धी एक्सप्रेस यासह बंद पडलेली विमानसेवा उडान अंतर्गत पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तसेच आयुष्यमान भारत योजनेतून लाखो नागरिकांना फायदा होत आहे.

दहा वर्षात केलेले काम फक्त ट्रेलर असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले. दहा वर्षे सत्तेत काम करताना ‘सरबत दा भला’ हे ब्रीदवाक्य घेऊन लोककल्याणाची कामे केली आहेत. करतारपूर कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यामुळे शीख भाविकांची मोठी सोय झाली आहे. शीख परंपरांशी जोडलेले अनेक कामे आपण केली आहेत. अफगाणिस्तानातील अशांत परिस्थिती पाहता तेथून ‘गुरु ग्रंथ साहिब’ भारतात आणण्याचे कामही करण्यात आले आहे. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातून आज ३७० कलम संपवण्यात आले आहे. तीन तलाक समाप्त केल्यामुळे मुस्लिम भगिनींना न्याय मिळाला आहे. आज देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. आगामी काळातील तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अयोध्येतील राम मंदिर पूर्ण झाले आहे. हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर ही काँग्रेस संतुष्ट नाही.  उद्घाटनाच्या कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार टाकला होता.

मराठवाड्याच्या विकासासाठी भाजपला, एनडीए आघाडीला साथ द्यावी असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड येथील या सभेत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाला भडकवण्याचे प्रयत्न होत असल्याची सांगितले. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवू असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही दहा टक्के मराठा आरक्षण दिले, न्यायालयात ते टिकवलेही. ज्यांनी आतापर्यंत आरक्षण दिले नाही आणि आम्ही दिले तर ते टिकणार नाही असे सांगत आहेत. भारताच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास माजी आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, डॉक्टर माधवराव किन्हाळकर आदींची उपस्थिती होती.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठवाड्यात पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा नांदेडला होत असल्याचे सांगितले. या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांच्या पहिल्या सभेचा मान नांदेडला मिळाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात गैरसमज पसरविले जात आहेत. ते गैरसमज दूर करण्याची गरज आहे. मराठा आरक्षण मिळणारच असे त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाचा विषय हा राजकीय नाही तर सामाजिक आहे. त्याला भाजपाचे समर्थन आहे. आरक्षणाचा विषय केंद्र सरकारचा आहे. हा विषय आपण मोदीपर्यंत नेऊ असेही माजी मुख्यमंत्री खासदार चव्हाण यांनी यावेळी आश्वस्त केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!