प्रशासकीय

पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना

नांदेड लोकसभा निवडणूक: २ हजार ६८ मतदान केंद्र

नांदेड – लोकसभा निवडणुकीत २६ एप्रिल रोजी नांदेड मतदारसंघासाठी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी पोलिंग पार्ट्या आपापल्या मतदान केंद्रावर आज २५ एप्रिल रोजी सकाळपासूनच रवाना होत आहेत या सर्व पोलिंग पार्ट्या अर्थात मतदान कर्मचारी दुपारपर्यंत मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रातून पोलिंग पार्ट्या गुरुवारी सकाळी ७ वाजेपासूनच रवाना होण्यास प्रारंभ झाला आहे. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण क्षेत्राच्या पोलिंग पार्ट्या नांदेड शासकीय तंत्रनिकेतन परिसरातून रवाना होत आहेत. शासकीय तंत्रनिकेतन परिसरात निवडणूक कर्मचाऱ्यांनी आपल्या नेमणुकीचे आदेश, निवडणूक साहित्य प्राप्त करून आपल्या मतदान केंद्राकडे कूच केली आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. मतदान कर्मचाऱ्यांचे शेवटचे आणि महत्त्वपूर्ण प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २४ एप्रिल रोजी पार पडले.

नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, देगलूर आणि मुखेड या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात १८ लाख ५१ हजार मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये ९ लाख ५५ हजार ८४ पुरुष मतदार तर ८ लाख ९६ हजार ६१७ महिला मतदार आणि १४२ तृतीयपंथी मतदार समाविष्ट आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये २ हजार ६८ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रियेसाठी १० हजार ६३७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्राध्यक्ष २ हजार ७६६, इतर मतदान अधिकारी ७ हजार ९२१, क्षेत्रीय अधिकारी २४२ याशिवाय मायक्रो ऑब्जरवर ३९ अशा विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

२६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी आठवडी बाजार होतो त्या ठिकाणचे बाजार दुसऱ्या दिवशी भरवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर २४ एप्रिलपासूनच मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कुलर बसवण्यात येणार आहेत. थंड पाण्याची व्यवस्था, प्रतीक्षालय, प्रथमोपचार पेटी, व्हील चेअर आणि ओआरएस याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रशासन ठरणार बाहुबली…लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आव्हान प्रशासनाने उचलले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीत मतदानाचे आणि त्यानंतर मतमोजणीचेही शिवधनुष्य पेलणार आहेत एकूणच प्रशासकीय यंत्रणा ही निवडणूक मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रियेत ‘बाहुबलीच’ ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!