प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात ५ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित, ८१२ कोटी रुपये निधीची शासनाकडे मागणी 

एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीने ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकरी झाले बाधित 

नांदेड – नांदेड जिल्ह्यात एक ते तीन सप्टेंबर २०२४ या कालावधीत ६२ मंडळात झालेल्या अतिवृष्टीने ५ लाख ९६ हजार ५१७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या शेती पीक नुकसान आणि शेत जमिनी नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून शेतकऱ्यांना अनुदान वाटपासाठी ८१२ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्तरीय समितीमार्फत नुकसानीच संयुक्त पंचनामे करण्यात आले. हे पंचनामे करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. राज्य शासनाने प्राप्त मान्यतेनुसार पीक अनुदान वाटपाचे दर वाढवण्यात आले आहेत. तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. या पंचनाम्यांनुसार लोहा तालुक्यात सर्वाधिक ६१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून तालुक्यातील ८० हजार ८४० शेतकरी बाधित झाले आहेत. लोहा तालुक्यासाठी ८४ कोटी ४० लाखांची मागणी करण्यात आली आहे.  किनवट तालुक्यात ५९ हजार १३२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. किनवटसाठी ८० कोटी ४२ लाख रुपयांची मागणी केली आहे. माहूर तालुक्यात २५ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून  ३५ कोटी १२ लाखांची मागणी करण्यात आली आहे. नांदेड तालुक्यात २१ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली आले. त्यासाठी २९ कोटी ८५ लाख रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. अर्धापूर तालुक्यात २४ हजार २४५ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आले. त्यापोटी ३२ कोटी ९७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. कंधार तालुक्यात ५२ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ७१ कोटी २७ लाख रुपये, बिलोली ३४ हजार १६९ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ४६ कोटी ४७ लाख रुपये, नायगाव तालुक्यातील ४१ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ५६ कोटी ६४ लाख रुपये, देगलूर तालुक्यात ३७ हजार ६६२ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ५० कोटी ९५ लाख रुपये, मुखेड तालुक्यात ४१ हजार ११४ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ५५ कोटी ९२ लाख रुपये, धर्माबाद तालुक्यात २० हजार ४२ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी २७ कोटी २६ लाख रुपये, उमरी तालुक्यातील २४ हजार ४२ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ३२ कोटी ७० लाख रुपये, भोकर तालुक्यातील ३८ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ५२ कोटी १९ लाख रुपये, मुदखेड तालुक्यातील २१ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी २९ कोटी ३५ लाख रुपये, हदगाव तालुक्यातील ६० हजार ४९२ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ८२ कोटी २७ लाख रुपये आणि हिमायतनगर तालुक्यातील ३२ हजार ८०५ हेक्टर क्षेत्रातील झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी ४४ कोटी ६१ लाख रुपये अनुदानाची शासनाकडे जिल्हा प्रशासनाने मागणी केली आहे.
जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत बाधित झालेल्या सर्वाधिक शेतकऱ्यांची संख्या लोहा तालुक्यातील आहे. ८० हजार ८४० शेतकरी या अतिवृष्टीने बाधित झाले आहेत.  नांदेड तालुक्यात ३४ हजार ६४१, अर्धापूर ३२ हजार ४४८, कंधार ७३ हजार ६५०,  बिलोली ३६ हजार ९९,  नायगाव ५६ हजार १७२, देगलूर ६१ हजार १२३, मुखेड ७९ हजार ६०३, धर्माबाद २८ हजार ७९५, उमरी ३४ हजार ३८, भोकर ४३ हजार ५९, मुदखेड ३० हजार ८१२,  हदगाव ७४ हजार २२८, हिमायतनगर ३४ हजार ५३३, किनवट ५७ हजार ७०२ आणि माहूर तालुक्यात २६ हजार १७२ शेतकरी बाधित झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.
या सर्व नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविला आहे. नुकसानीच्या अनुदानापोटी ८१२ कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली आहे. शासन स्तरावरून या निधी ची उपलब्धता होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!