
नांदेड – शहराचा पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात खंडित झाल्यामुळे नांदेडकर संतप्त झाले आहेत. मात्र हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत नाही, महापालिकेचे नियोजन नाही असे अनेक आरोप नागरिकांतून, विविध संघटनांकडून होत आहेत. मात्र प्रत्यक्षात दोन मे रोजी पहाटे निर्माण झालेला हा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शंभरहून अधिक कर्मचारी, अधिकारी सलग सात दिवस २४ तास प्रयत्न करत असल्याचे वास्तव आहे. संपूर्ण पंप हाऊसच कोलॅप्स झाल्यानंतर पुन्हा नव्याने उभारणी करण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो निश्चितच द्यावाच लागणार लागेल.
महाराष्ट्र दिनाच्या मध्यरात्री विष्णुपुरी प्रकल्पावरील कोटीतीर्थ येथील पंपहाऊसची पाईपलाईन बंद पडली. येथील एक जॉईंट निसटल्याने नांदेड शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला. कोटीतीर्थ येथील पंपगृहातून पाणी उचलून ते काबरानगर येथील दोन जलशुद्धीकरण केंद्रात घेतले जाते. ते पाणी शुद्ध करून नांदेडकरांना दिले जाते. कोटीतीर्थ येथील पंपहाऊस संपूर्णतः कोलॅप्स झाल्याचा प्रकार दोन मे च्या पहाटे घडला होता. त्यानंतर शहराला पाणीपुरवठा कसा करायचा याबाबतचे नियोजन आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी हाती घेतले. यासाठी पाणीपुरवठा विभागही अविरत कार्यरत आहे. पहिल्या टप्प्यात कोटीतीर्थ पंपहाऊस येथील निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी तब्बल तीन ते चार दिवस लागेल हे घोषित करण्यात आले. तोपर्यंत पर्यायी पाणी पुरवठा करण्यासाठी इसापूर धरणातून पाणी सोडावे अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली. पाणी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही तातडीने ईसापुर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी झाली. पाणी अपेक्षेपेक्षा २४ तास उशिरा पोहोचले आणि सोमवारपासून शहरातील काही भागांना सांगवी पंपहाऊस येथून पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी देण्याचे काम सुरू झाले. त्याचवेळी टँकरचेही नियोजन करण्यात आले होते. मात्र शहरातील एकूण लोकसंख्या आणि टँकरचा अभाव ही बाब लक्षात घेता संपूर्ण उत्तर नांदेडला टँकरने पाणीपुरवठा करणे अशक्यच होते. यातून काही भागांना पाणीपुरवठा झाला तर काही भागांना झाला नाही. यामुळे अनेक ठिकाणी तंटेही निर्माण झाले. कोटीतीर्थ पंपगृहाचे काम करण्यासाठी कोलकत्ता, हैदराबाद आणि नाशिक येथून साहित्य आणावे लागले. हे साहित्य आणण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता काम होण्यास काही अंशी विलंबही झाला. तर दुसरीकडे आहे ती पाईपलाईन पूर्णतः नव्याने बदलणे हेही मोठे आव्हान होते. ते आव्हानही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पेलले. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, कार्यकारी अभियंता दिलीप आरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ तास हे काम सुरू होते. यासाठी उपअभियंता राजकुमार बोडखे, कनिष्ठ अभियंता जकीउल्ला खान, व्यंकटेश गोकुळे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली.
दुसरीकडे हे काम करणाऱ्या ठेकेदारानेही अत्यंत तातडीने साहित्य उपलब्ध करून आपली कार्यतत्परता दाखवून दिली. मुंबई येथील जवळपास २५ ते ३० कर्मचारी या कामासाठी आणण्यात आले होते. त्यामुळे हे काम म्हणावे तितके सोपे नव्हते. परंतु शहरवासीयांना पाणी देण्यासाठी २४ तास काम करून कार्यरत राहून ते अंतिम टप्प्यात आणण्यात यश आले आहे.
कोटीतीर्थ पंपगृहातील यंत्रणा संपूर्ण कोलॅप्स झाल्यानंतर येथे पूर्ण काम नव्याने केले जात आहे. हे काम करताना यांत्रिक साहित्याचा बदल केला जात आहे परंतु कॉंक्रिटीकरणही केले जात आहे. जवळपास २० ते २५ सिमेंट काँक्रीट ट्रक या ठिकाणी लागले आहेत. हे काम झाल्यानंतर क्युरींगचाही कालावधी काहीअंशी लागणार आहे. या सर्व अडचणीवर मात करत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.
बुधवारी रात्री काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढचे २४ तास क्युरिंगसाठी वेळ द्यावाच लागणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी शहरासाठी पाणी उचलता येणार आहे त्यानंतर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोटीतीर्थ पंपगृहावर अशी आहे यांत्रिक सुविधा…
विष्णुपुरी प्रकल्पावरील महापालिकेच्या कोटीतीर्थ पंपहाऊस येथे ३३५ एचपी क्षमतेचे पाच पंप आहेत. हे पंप किर्लोस्कर मेड आहेत. तर दुसरीकडे एक जुना पंप २४० एचपी क्षमतेचा आहे. येथे असलेल्या सहा पंपाद्वारे शहरासाठी पाणी उचलले जाते. चार पंपाने २४ तासात ९० दशलक्ष लिटर पाणी घेतले जाते. हे पाणी काबरानगर आणि डंकीन येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पोहोचविले जाते. काबरानगर येथे दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत. यातील एकाची क्षमता ६० दशलक्ष लिटर आणि दुसऱ्याची ३५ दशलक्ष लिटर क्षमता आहे. तर डंकीन येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता २७ दशलक्ष लिटर इतकी आहे. या दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी शुद्ध करून शहराला पाणीपुरवठा केला जातो.
https://youtu.be/na6e4y2zCQI?si=IFV1oSJsPnDngqAz
नळाने जेवढे पाणी मिळते तेवढे टँकरने मिळणे शक्य नाही- आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे…कोटीतीर्थ येथे निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर शहरात अनेक भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचवळी दोन पंपगृहातून दक्षिण नांदेड आणि उत्तर नांदेड येथील काही भागांना पाणीपुरवठा होत आहे. हे दोन्ही पंपगृह कमी क्षमतेचे असल्याने पूर्ण भागाला पाणीपुरवठा एकाच वेळी शक्य नाही. काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा करताना नळाला जेवढे पाणी येईल तेवढे पाणी टँकरद्वारे पुरवणे शक्य नाही. शहरात आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठा करण्याची प्रयत्न केले जात असल्याचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले.