महापालिका

महापालिका प्रशासनाच्या लाडक्या आर.अँड बी. ने उडवली शहराची दाणादाण..!

एका तासाच्या पावसाने संपूर्ण शहर झाले जलमय 

नांदेड: शहर स्वच्छतेसाठी प्रतिमाह अडीच ते तीन कोटी रुपये उचलणाऱ्या स्वच्छता कंत्राटदार आर अँड बी ने शहरातील अनेक भागात महिना महिना कचराच न उचलल्याने नाल्या तुंबून संपूर्ण शहर जलमय झाले आहे. एका तासाच्या पावसाने रविवारी संपूर्ण शहर वेठीस धरल्यासारखीच परिस्थिती होती. शहरात वादळी वारे आणि पावसाचे रात्रीही वातावरण असल्याने रात्रभरात पुन्हा कोणते संकट उद्भवते याचीच भीती शहरवासीयांच्या मनात अजूनही कायम आहे.

नांदेड शहरात स्वच्छतेची जबाबदारी आर.अँड बी. या ठाण्यातील खाजगी कंत्राटदराकडे आहे. ठाण्यातून नांदेड शहरातील स्वच्छतेचा कारभार हाकणाऱ्या या कंपनीची मुदत संपल्यानंतरही कंपनीशी जवळीक साधलेल्या काही अधिकाऱ्यांनी आर.अँड बी. ला पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ही मुदतवाढ देताना पूर्वीपेक्षा जास्त दराने मुदतवाढ दिली आहे. सदर कंपनीने घरोघरी जाऊन कचरा गोळा करावा असे महापालिकेने कंपनीशी केलेल्या करारामध्ये नमूद आहे. मात्र आजघडीला आर. अँड बी.चे कर्मचारी शहरातील कोणत्या भागात घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात? या प्रश्नाचे उत्तर महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी द्यावे. त्यातही अपार्टमेंट असेल तर अपार्टमेंटच्या प्रत्येक फ्लॅटमधून कचरा गोळा करावा असे स्पष्टपणे नमूद आहे. शहराच्या मुख्य भागातील नगरामध्येच सदर कंपनीकडून घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात नाही. तर महापालिका हद्दीतील शहरालगत असलेल्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये या कंपनीचे कर्मचारी वर्षातून एकदा तरी जातात की नाही हा प्रश्नच आहे. या कंपनीने कचऱ्याचे विलगीकरण करून कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावावी असेही करार पत्रकात नमूद आहे. शहर वासीयांमध्ये कचऱ्याच्या विलगीकरण तसेच स्वच्छतेबाबत सदर ठेकेदाराकडून जनजागृती पर उपक्रम राबवावेत असे अपेक्षित आहे मात्र मागच्या पाच वर्षात या ठेकेदाराने एकही जनजागृती उपक्रम राबवला नाही. तरीही याच आर. अँड बी. ला महापालिका प्रशासनाने मुदतवाढ देऊन वाढीव दराने काम सोपवले आहे, हेही एक नवलच आहे.

प्रत्यक्षात शहरातील जागोजागी असलेले ढिगारे पाहता कचऱ्याचे विलगीकरण होते की नाही तसेच करारातील विलगीकरणाच्या अटीची पूर्तता कोणाच्या भरोशावर केली जात नसेल हा शहरवासीयांना पडलेला एक यक्षप्रश्नच आहे. मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत या कंपनीला सांभाळून ठेवणारे अधिकारी सदर ठेकेदाराकडून कोणत्या वार्षिक की मासिक कराराप्रमाणे काम करून घेत आहेत हे मनपाचा स्वच्छता विभागच स्पष्टपणे सांगू शकतो.

स्वच्छता विभाग आणि स्वच्छता कंत्राटदाराचे असे हे मधुर नाते असताना शहरात स्वच्छतेची कामे नियमितपणे व्हावेत अशी अपेक्षा बाळगणे चुकीचेच ठरणार आहे. मात्र त्याचा फटका शहरवासीयांना अशा अवकाळी पावसातही सहन करावा लागत आहे. शहरातील कचरा न उचलण्यामुळे तो थेट नालीत जातो. नाल्या तुंबतात आणि शहरातील रस्तेच जलमय होऊन जातात. हा अनुभव शहरवासीयांना दरवर्षी येतो मात्र ‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे महापालिका अधिकारी अचानक पाऊस झाला आणि अशी परिस्थिती उद्भवली अशी मखलाशी करतात. स्वच्छता ठेकेदाराचे संरक्षण करतात. त्यामुळे कोणतीही दंडात्मक कारवाईची शक्यता दूरदूरपर्यंत नसतेच.

शहरातील प्रमुख रस्ते रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे जलमय झाले होते. हा प्रश्न केवळ नियमित स्वच्छता न झाल्यामुळेच उद्भवला आहे. लहान नाल्या मधून कचरा मोठ्या नाल्यात जातो. परिणामी मोठे नाले तुंबले आहेत. या तुंबलेल्या नाल्यांचे पाणी आता काही वस्त्यांमध्ये जाण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने अबचलनगर येथील पत्रकार रवींद्रसिंघ मोदी व इतर नागरिकांनी याबाबत निवेदन देऊन नालेसफाईची मागणी केली आहे. संभाव्य धोका महापालिकेच्या निदर्शनात आणून दिला आहे. संपूर्ण वसंतनगरही नेहमीप्रमाणे जलमय झाले आहे. वजीराबाद भागातील तिरंगा चौक ते सोनू कॉर्नरही पाण्याखालीच आहे. महापालिकेचे क्षेत्रिय अधिकारी या ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्यास धजावत नाहीत. कारण मुख्यालयातूनच ठेकेदाराला सदैव पाठिंबा असतो. त्यामुळे त्यांच्या कारवाईला महत्त्व उरतच नाही.

सध्या पावसाळापूर्व कामे महापालिकेने हाती घेतली आहेत. ही कामे करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पावसाळ्यात एखादा मोठा पाऊस झाल्यास पुन्हा जैसे थे परिस्थिती उद्भवते. त्यामुळे शहरवासीय आणि कचरा असा पाठशिवणीचा खेळ न थांबणाराच आहे. त्यातही कचऱ्याचे वजन वाढावे म्हणून माती, दगड मिसळणे, डम्पिंग ग्राउंडवरील वजन काट्यात हेराफेरी करणे असे अनेक प्रकारही उघडकीस आलेले आहेतच. पण नेहमीप्रमाणे कारवाई शून्यच..

त्यातही अपार्टमेंट असेल तर अपार्टमेंटच्या प्रत्येक फ्लॅटमधून कचरा गोळा करावा असे स्पष्टपणे नमूद आहे. शहराच्या मुख्य भागातील नगरामध्येच सदर कंपनीकडून घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात नाही. तर महापालिका हद्दीतील शहरालगत असलेल्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये या कंपनीचे कर्मचारी वर्षातून एकदा तरी जातात की नाही हा प्रश्नच आहे. या कंपनीने कचऱ्याचे विलगीकरण करून कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावावी असेही करार पत्रकात नमूद आहे. शहर वासीयांमध्ये कचऱ्याच्या विलगीकरण तसेच स्वच्छतेबाबत सदर ठेकेदाराकडून जनजागृती पर उपक्रम राबवावेत असे अपेक्षित आहे मात्र मागच्या पाच वर्षात या ठेकेदाराने एकही जनजागृती उपक्रम राबवला नाही. तरीही याच आर. अँड बी. ला महापालिका प्रशासनाने मुदतवाढ देऊन वाढीव दराने काम सोपवले आहे, हेही एक नवलच आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!