गुन्हेगारी

…अखेर पोलिसांना सापडले बिलोली अन् देगलूर तालुक्यात वाळूचोरी करणारी वाहने 

बिलोली, देगलूर आणि सिंदखेड पोलीस ठाण्यात अवैध वाळू चोरी प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

नांदेड – जिल्ह्यात नांदेड शहरासह परिसरातील अनेक गावांमध्ये आणि बिलोली, देगलूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे.  वाहतूक सुरू असताना गेल्या तीन महिन्यापासून पोलिसांना ही बाब नजरेत येत नव्हती. अखेर देगलूरसह बिलोली आणि सिंदखेड ठाण्यात वाळू चोरी प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलोली तालुक्यातील बडूर फाटा येसगी ते नांदेड रस्त्यावर ३० मे रोजी एमएच २५ एडी ७५८६ क्रमांकाच्या हायवा ट्रकमधून भर दुपारी तीन वाजेदरम्यान आठ ब्रास रेती चोरून नेली जात होती. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार या चोरून वाहतूक केल्या जात असलेल्या वाळूची किंमत अंदाजे २४ हजार रुपये इतकी आहे. चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने ही वाळू नेली जात असताना पोलिसांनी हा हायवा ट्रक पकडला. याप्रकरणी पोकॉ लक्ष्मण बच्चेवार यांनी बिलोली ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देगलूर येथेही आरटीओ पोस्ट जवळच ३० मे रोजी दोन चोरटे ट्रॅक्टरमधून दोन ब्रास वाळू चोरून नेत होते. या वाळूची अंदाजीत किंमत ५ हजार रुपये पोलिसांनी लावली आहे. पोलिसांनी हे ट्रॅक्टर पकडून दोघाविरुद्ध देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची तक्रार अब्दुल वाजिद अब्दुल वाहिद यांनी दिली आहे.
अन्य एका प्रकरणात माहूर तालुक्यात उमरागाव ते मनीरामथड दरम्यान एका टिप्परमध्ये दोन ब्रास वाळू ज्याची किंमत आठ हजार रुपये इतकी आहे, ती वाळू चोरीच्या उद्देशाने दोघेजण घेऊन जात होते. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून सिंदखेड ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, नांदेड तालुक्यातील भनगी येथे २७ आणि २८ मे रोजी महसूल आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईत उत्तर प्रदेशातील तीन मजुरांवर नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थानिकांचा मात्र शोध लागला नाही ही बाबही विशेष ठरली आहे.
https://youtu.be/UurvSgsu2GQ?si=wyu9HbL-237Hzym9https://youtu.be/UurvSgsu2GQ?si=RguXdtvlCq6ecDXt
 ‘योजना महाराष्ट्राची, लाभ मात्र तेलंगणा अन् कर्नाटकवासियांना’…जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत आहे. बनावट पावत्या तयार करून लाभार्थ्यांच्या नावे बिलोली आणि देगलूर तालुक्यातून हजारो ट्रक तेलंगणा आणि कर्नाटका राज्यात जात आहेत. चाकूर पोलिसांनी पकडलेल्या काही वाळू ट्रकच्या माध्यमातून ही बाब पुढे आली आहे. मुखेडमध्येही सात ट्रक पकडण्यात आले आहेत. ‘योजना महाराष्ट्राची, लाभ मात्र तेलंगणा अन् कर्नाटकवासियांना’ असेच वाळू धोरण नांदेड जिल्ह्यात राबविले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. महसूल विभागाचे स्थानिक अधिकारी यामध्ये थेट समाविष्ट असल्यानेच या चोरट्या वाळू वाहतुकीला खुली सूट दिली जात असल्याची बाबही पुढे आली आहे. २४ तास ही अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे. फक्त सहा चाकी वाहनातून वाळू वाहतुकीस परवानगी असताना २० ते २४ चाकी वाहनांमधूनही वाळूची वाहतूक केली जात असताना त्यांना कोणीही अडवणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे बिनदिक्कतपणे ही वाहतूक जिल्हाभर सुरू आहे. अगदी शासकीय कार्यासमोरून, पोलीस ठाण्यासमोरून वाहतूक सुरू असताना त्या वाहनावर गुन्हे का दाखल केले जात नसावेत असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.  अशाच एका वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने दोघांना उडवल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सगरोळी येथे घडलेली होती. आणखी किती बळी या अवैध वाळू वाहतुकीच्या माध्यमातून घेतले जातील हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!