
नांदेड – नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत चार दिवसात तीन खून झाल्यानंतर येथील ठाणे प्रमुखांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. तिसऱ्या खुनाची माहिती मिळताच गुरुवारी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे थेट नांदेड ग्रामीण ठाण्यात दाखल झाले. त्यांनी तब्बल दोन तास ठाणे प्रमुखासह अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कायदा व सुव्यवस्था पालनात नेमकी कुठे चूक होत आहे, याचा जाब विचारला. त्यामुळे आगामी काळात नांदेड ग्रामीण ठाण्याचे प्रभारी बदलले जातील की तेच राहतील, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.
नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत जुन्या नांदेडातील हिलालनगर येथे घराजवळ दारू पिऊ देण्याच्या कारणावरून सय्यद सलमान या युवकाला रविवारी पहाटे खंजीरने भोसकून जीवे मारण्यात आले होते. याप्रकरणी शेख अक्रम शेख महबूब, असलम उर्फ जड्डू सय्यद असलम आणि शेख अमीर शेख मोहम्मद या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी रात्री अनैतिक संबंधातून शेख शहबाज या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा युवकाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्या पाठोपाठ बुधवारी रात्रीही बळीरामपूर भागातील अमोल रामेश्वर लांडगे या २३ वर्षीय युवकाचा त्याच्या सोबत राहणाऱ्या तीन युवकांनीच खून केला. खुनाची ही मालिका नांदेड ग्रामीण हद्दीतील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारी होती.
बुधवारी रात्री बळीरामपूर येथे झालेल्या खुनाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी थेट गुरुवारी दुपारी बारा वाजता नांदेड ग्रामीण ठाणे गाठले तेथे ठाणे प्रमुख पोलीस निरीक्षक नागनाथ आईलाने यांच्याशी चर्चा करून या घटनांची माहिती घेतली. एकूणच ठाणे हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यात अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबतीत पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी ठाणे अधिकाऱ्यांना जब विचारला तसेच या घटनांचा तपास लावून संबंधितांना तात्काळ गजाआड करण्याचे आदेशही दिले आहेत.
नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीत घडलेले तीनही खून हे गुन्हेगारी पार्श्वभूमीतूनच झाले आहेत. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना मोकळे सोडणे, त्यांच्या हालचालीवर नजर न ठेवणे हे किती घातक असते हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आदेशही पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी दिले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखाही निष्क्रियच…
नांदेड शहरालगत असलेल्या ग्रामीण ठाणे हद्दीत सलग तीन दिवसात तीन खून झाले. पहिल्या खुनाच्या घटनेनंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हिंसक कारवायांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून आळा घालण्याची गरज होती. रेकॉर्डवरील या गुन्हेगारांची माहिती घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याने गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत. त्यात अंतर्गत वादातून एकमेकांना संपविण्याचे सत्रच शहरालगतच सुरू झाले आहे. यापूर्वी शहरात दोन गुन्हेगारी टोळ्या आमने-सामने आल्या असताना त्यांच्या मुसक्या नांदेड स्थानिक गुन्हा शाखेनेच आवळल्या होत्या. त्याप्रमाणेच आता पुन्हा एकदा स्थानिक गुन्हा शाखेला ऍक्टिव्ह मोडमध्ये यावे लागणार आहे.
दूध डेअरी, ढवळे कॉर्नर बनले गुन्हेगारांचा अड्डा… नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील दूध डेरी चौकात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत येथे मटका, जुगार अवैध दारू विक्री ऑनलाइन लॉटरी असे प्रकार खुलेआम सुरू आहेत. ढवळे कॉर्नर येथेही मोठ्या प्रमाणात आरोपींचा वावर आहे. मुख्य रस्त्यावरच दारुड्यांनी ठाण मांडले आहे. येथे सकाळपासूनच दारुडे रस्त्यावर असतात. यात अनेक गुन्हेगारांचाही समावेश आहे. या ठिकाणी अनेक वादही होत असतात. या वादाचा सामान्य नागरिकांना फटका बसत असतो. या ठिकाणी ग्रामीण पोलीस या कडून कधी कधी कारवाई केली जाते मात्र पुन्हा काही तासातच परिस्थिती ‘जैसे थे’ होते.