
नांदेड – नांदेड महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पुन्हा एकदा बुधवारी दुपारी झालेल्या एका हलक्या पावसाने पोलखोल झाली आहे. शहरातील अनेक भागात मुख्य रस्त्यावरच पाणी साचले असून महापालिकेने कामे पूर्ण होत असल्याचा केलेला दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. मुख्य पावसाळ्याला अद्याप सुरुवात झालेली नसतानाच नांदेडमधील एकमेव एन.आर. आय. निवास आणि श्री गुरुगोविंद सिंघजी संग्रहालयापुढेच पाण्याचे तळे साचले आहे. मुख्य पावसाळ्यात येथे काय परिस्थिती उद्घभवेल याची चिंता आता नांदेडकर करत आहेत. या दोन्ही ठिकाणी जगभरातून भाविक येत असतात. येथे भेट देत असतात. त्यामुळे हे चित्र पाहून नांदेडची अवस्था काय आहे हे त्यांच्या निदर्शनात येत आहे
नांदेड शहरात तब्बल ८९ मोठे नाले आहेत. या नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून घरे, मोठमोठे दुकाने उभारण्यात आली आहे. शहरातले नाले मोकळे, उघडे असावेत, अतिक्रमित नसावेत असा नियम आहे. प्रत्यक्षात नांदेडमध्ये नाल्यावर अतिक्रमण करण्याची स्पर्धा लगली आहे. शहरातील ३२ नाल्यांची सफाई ही पोकलेनद्वारे केली जात आहे. तर १८४ लहान नाले आहेत. ज्यांची सफाई मजुरामार्फत करणे अपेक्षित आहे. यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. त्याचवेळी पावसाळापूर्व कामासाठी कोट्यवधी रुपये खाजगी ठेकेदारांवर खर्च केले जात आहे. नालेसफाईवर क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे नियंत्रण असले तरीही ते अधिकारी किती सक्षम आहेत, यावरच आता शंका निर्माण झाली आहे. नवीन नांदेडातील कौठा, असर्जन, वसरणी, भीमवाडी, असदवन तसेच जुन्या नांदेडातील ब्रह्मपुरी, बिलालनगर, देगलूर नाका, मिल्लतनगर आदी भागात अजूनही स्वच्छता कर्मचारी नसल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.
नाल्यातील कचरा रस्त्यावर येत आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी नाल्या तुंबल्याचा प्रकार वारंवार घडत आहे. येथे पाणी थांबू नये, नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्यांनी शहरातील अबचलनगर, बाफना, अनुराधा पॅलेस परिसर, वसंतराव नाईक चौक आणि दशमेशनगर या भागात पाणी साचणार नाही याकडे लक्ष देऊन उपाययोजना करणे अपेक्षित आहे. या उपाययोजना कितपत प्रत्यक्षात उतरल्या आहेत हे बुधवारी झालेल्या पावसाने पुन्हा एकदा उघडे केले आहे. त्याचवेळी शहरातील तारासिंग मार्केट, जुना मोंढा परिसर या भागात मोठ्या प्रमाणात कचरा दिवसभर साचलेला असतो. हा कचरा उचलण्यासाठी कोणीही येत नाही अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या इतवारा क्षेत्रीय कार्यालयापुढेच मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. दोन्ही बाजूच्या नाल्या तुंबल्यामुळे हा प्रकार घडत आहे. याचा संपूर्ण पावसाळ्यात आता नांदेडकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.
नांदेड महापालिका स्वच्छतेसाठी आर. अँड बी. या ठेकेदाराला वाढीव दराने कोट्यावधी रुपये दरमहा देत असते. असे असताना स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे ही स्वच्छता अशीच राहिली तर आगामी पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल हे निश्चित.
दरम्यान, नांदेड शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रमुख मार्गांपैकी एक मार्ग असलेल्या नवीन पुलावर बुधवारी झालेल्या पावसाने पाणीच पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढताना दुचाकीस्वारांची अडचण झाली. फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावरही पाणी उडत होते. यातून वादाचे अनेक प्रसंग घडले. नवीन पुल हा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतो. त्यामुळे या पुलावरील माती कधी काढली जाईल असा प्रश्न आता सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. हजारो नागरिक दररोज या मार्गावरून ये जा करतात. सिडको, हडको तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांची शहरांमध्ये याच पुलावरून दररोज ये – जा असते.
नांदेड महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोलच…शहरात मोठ्या नाल्यांसह छोट्या नाल्यांचे सफाई वेळेवर होईल. हे काम झाल्यानंतर नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत, असा दावा महापालिकेने केला आहे. मात्र हा दावा लहान लहान पावसानेही फोल ठरत आहे. शहरातील गोकुळनगर भागातील गोरक्षण परिसरातील परिस्थिती पाहता येथे मोठ्या नाल्यातील पाणी एका जागी अद्यापही तुंबलेले आहे. मोठ्या नाल्यांची ही परिस्थिती आहे तर लहान नाल्यांची परिस्थिती काय असावी हे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे शहरात अंतर्गत नाल्यांची सफाई होत असलेले चित्र कुठेही दिसत नाही. त्यामुळे अतिरिक्त मजूर नेमके कागदावरच आहेत काय असा प्रश्न पुढे येत आहे.