राजकीय

केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

ना किसी से दोस्ती, ना किसी से बैर... भाजपा चुकीच्या धोरणावरही ठेवले होते अनेकदा बोट

नांदेड – भारतीय जनता पक्षाने हिंगोली आणि वाशिम – यवतमाळ लोकसभा मतदारसंघात दिलेले उमेदवार चुकीचे होते. या जागा भाजपाने मित्र पक्षाला सोडायला पाहिजे नव्हत्या. मुख्यमंत्र्यांच्या हट्टापायी हा निर्णय घेण्यात आला, तो चुकीचा ठरला. त्यात पक्षाचे नुकसान झाले. हिंगोलीची जागा तर मलाच मिळायला हवी होती अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी देणाऱ्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी शनिवारी आपला भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी गेल्या दहा वर्षात पक्षाने आपल्याला जी संधी दिली, त्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे धन्यवाद व्यक्त केले आहे. कोणाबद्दलही मनात कटुता न ठेवता आपण हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सूर्यकांता पाटील यांनी राजकारणात जवळपास ४५ वर्षे काम केले आहे. या ४५ वर्षात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली आहे. सूर्यकांत पाटील या १९८० मध्ये काँग्रेसकडून हदगाव विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाल्या. त्यांनी बापूराव शिंदे यांचा पराभव केला होता. सूर्यकांता पाटील यांनी खासदारकीची निवडणूक १९९१ मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढवली. त्यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे डॉ. डी. आर. देशमुख आणि डॉ. व्यंकटेश काब्दे यांचा त्यांनी पराभव केला होता.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोनदा निवडून आल्या होत्या. युपीए- २ सरकारमध्ये त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास तथा संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून कामगिरी पार पाडली आहे. २०१९ मध्ये त्यांना सुभाष वानखेडे यांनी पराभूत केले. २०१४ मध्ये हिंगोली मतदारसंघ हा काँग्रेसला देण्यात आला आणि त्यांची निवडणुकीची संधी हुकली. पुढे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानपरिषदेवर घेण्याचा निर्णय झाला होता. त्यांचे नावही निश्चित झाले होते. पण ऐनवेळी त्यांचे नाव वगळून रामराव वडकुते यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या सूर्यकांता पाटील यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर हिंगोली लोकसभा मतदासंघांसाठी त्यांचे नाव चर्चेत आले. पण ती जागा शिवसेनेला सुटली आणि त्यांचे नाव पुन्हा मागे पडले. मागच्या दहा वर्षाच्या भाजपातील कार्यकाळात त्यांना पक्षाने कोणतीही मोठी जबाबदारी दिली नाही अथवा कोणतेही मोठी संधी दिली नाही हे स्पष्ट आहे. त्यांच्या कर्तृत्वाची स्थानिक नेतृत्वाने दखल घेतली ना राज्यस्तरावरील नेतृत्वाने. त्यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर भाजपाच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यासमोर सरकारच्या चुका निदर्शनास आणून दिल्या होत्या. पक्षाच्या चुकत असलेल्या धोरणावरही त्यांनी वेळोवेळी बोट ठेवले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील घडामोडीनंतर भारतीय जनता पक्षात अनेक गट समोर येत आहेत. या गटातटातील वाद मुद्द्यावरून गुद्द्यावरही येत आहे. अशा परिस्थितीत तत्वाने काम करणाऱ्या सूर्यकांता पाटील यांना भाजपा काम करणे शक्य होईल की नाही अशीच परिस्थिती उद्भवली होती. अखेर त्यांनी २२ जून रोजी भाजपाला राम राम ठोकला. त्यांच्या नव्या राजकीय वाटचाली संदर्भातही आता चर्चा सुरू झाली आहे. लवकरच त्या बाबीही स्पष्ट होणार आहेत.

चार वर्षांपूर्वीच घेतला होता राजकीय सेवानिवृत्तीचा निर्णय…सूर्यकांता पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वीच राजकीय सेवानिवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. ४३ वर्ष वर्षाच्या राजकारणात आपण एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. मिळालेले काम मान लावून केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अशा अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस्वी रमू शकत नाही. आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. पण माझा निस्वार्थ प्रवास मला फार समृद्ध करून गेला. जेव्हा लिहायचे तेव्हा लिहिलं पण आज मी माझा राजकीय प्रवास थांबवित आहे. यापुढे नव्या पिढीसाठी काम करील, घरी बसणार नाही. बसून कुरवळण्या एवढे काही नाही. विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवित आहे असे त्यांनी चार वर्षांपूर्वीच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये स्पष्ट केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!