नांदेड – विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता जिल्ह्याला मिळणाऱ्या मंत्रिपदाकडे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीचा पूर्णतः सफाया करणाऱ्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतील कोणत्या आमदाराला आता मंत्रिपद मिळेल याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सर्वात अनुभवी मीच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे एकमेव आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे. मात्र त्यांना नांदेडमधूनच विरोध होण्याची मोठी शक्यता आहे. त्याचवेळी मंत्रिपदाच्या निवडीसाठी माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांची भूमिकाच आता निर्णायक ठरणार आहे.
विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भाजपाला पाच, शिवसेना शिंदे गटाला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक जागा मिळाली आहे. यातील विजयी आमदारांकडे पाहिले असता प्रतापराव पाटील चिखलीकर हे तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्याचवेळी २०२९ च्या निवडणुकीत ते नांदेड जिल्ह्याचे खासदारही झाले होते. त्यामुळे त्यांचा अनुभवाचा दावा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. त्याच वेळी पूर्वाश्रमीचे ते भाजपाचे खासदार होते जिल्ह्यात भाजपा वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता त्यामुळे त्यांनी भाजपाने देवेंद्र फडणवीस तसेच आता त्यांचे नेते अजित पवार यांच्या माध्यमातून मंत्रीपदासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू केली आहे. ही लॉबिंग अनुभवाच्या आधारे आणि जिल्ह्याचे नेतृत्व पुन्हा एकदा आपल्याकडे खेचण्याच्या दृष्टीने सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. लोहा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. चिखलीकर यांच्या मंत्रीपदास नांदेडमधूनच मोठी आडकाठी राहील हे स्पष्ट आहे. नांदेडमधील त्यांचे विरोधक त्यांना मंत्रिपद मिळू नये यासाठीच प्रयत्न करतील हेही निश्चित आहे.
भाजपाचे मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रीपदासाठी त्यांनीही आता प्रयत्न सुरू केले आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडमधील एकमेव शिलेदार असलेले बालाजी कल्याणकर हे आता दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मंत्री पदासाठी तेही इच्छुक असले तरीही आता मुख्यमंत्री कोण होईल यावर त्यांच्या मंत्रिपदाचा निर्णय अपेक्षित आहे. शिंदे गटाचे आणखी दोन आमदार पहिल्यांदाच जिल्ह्यात निवडून आले आहेत. त्यामध्ये नांदेड दक्षिणचे आनंद बोंढारकर आणि हदगावचे बाबुराव कदम यांचा समावेश आहे. देगलूरचे जितेश अंतापुरकर हेही दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. मात्र ते आता आमदारकीवरच समाधानी राहतील. नायगावचे आमदार राजेश पवार हेही दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनीही मंत्रीपदासाठी आता फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. भीमराव केराम हेही मंत्री पदासाठी इच्छुक असून ते किनवट मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.
तर… ॲड. श्रीजया चव्हाण जिल्ह्याच्या पहिल्या महिला पालकमंत्री ठरणार…२०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कन्या ॲड. श्रीजया चव्हाण या भोकर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच विजयी झाल्या आहेत. भोकर मतदारसंघावर चव्हाण कुटुंबीयांचे सातत्याने प्राबल्य राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर अशोकराव चव्हाण यांचे जिल्ह्यातील नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. त्यामुळे मंत्रीपदाच्या निवडीमध्ये अशोकराव चव्हाण यांची भूमिका ही आता महत्त्वपूर्ण तसेच निर्णायक ठरणार आहे. त्यांनी मनावर घेतले तर ॲड. श्रीजया चव्हाण यांच्याकडेही मंत्रिपद येऊ शकते. तसे झाले तर त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणूनही काम पाहू शकतील, हे निश्चित.