राजकीय

आधी युती धर्म पळायला शिका, मगच सल्ले द्या : भाजपा जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांचा प्रहार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये महायुतीत खडाजंगी सुरू

नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात सध्या लोकप्रतिनिधीची सुरू असलेली ‘एकला चलो रे’ ची भूमिका ही महायुतीचा धर्म पाळणारी नाही. त्यामुळे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आधी महायुतीचा धर्म पाळावा त्यानंतरच इतरांची पत प्रतिष्ठा काढण्यासाठी आपल्या घरगड्यांना सांगावेत अशा कठोर शब्दात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांनी आ. कल्याणकर आणि जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे यांच्यावर प्रहार केला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे यांनी नुकताच  भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर बिनबुडाचा आरोप केला आहे. या आरोपांचे खंडन साहेबराव गायकवाड यांनी केले आहे. गायकवाड पुढे म्हणाले, आमदार बालाजीराव कल्याणकर सर्वसामान्य नगरसेवक होते. परंतु महायुतीच्या बळावर ते आमदार झाले. आ. कल्याणकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या तोफा धडाडल्यानंतर जनतेत कल्याणकर यांच्या प्रति विश्वास निर्माण झाला होता. अन्यथा बालाजी कल्याणकर यांना विधानसभेत पाठवणे इतकी त्यांची सामाजिक किंवा राजकीय पत, प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे त्यांनी युतीचा धर्म पाळावा.

युतीधर्म विसरलात तर आगामी काळात महाग पडेल असा इशारही गायकवाड यांनी दिला. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुरुवातीचे अडीच वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होतात. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सोबत आपण आलात आणि महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालात. त्यानंतरच नांदेड उत्तरमध्ये खऱ्या अर्थाने विकासाची कामे सुरू झाली आहे. जो विकास निधी आला आहे, त्या विकास निधीतून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कामे देणे आवश्यक होते. किंबहुना विकास कामात सामावून घेणे हे आवश्यक होते. दुर्दैवाने त्यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका बजावली.

कोणत्याही कार्यक्रमाला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधी बोलवले नाही. हा तुमच्यातील गर्व आणि अहंकार आगामी काळात महाग पडणार आहे. ज्या सच्चा शिवसैनिकाला डावळून आपल्या बोटावर नाचणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यात जिल्हाप्रमुख पदाची माळ घातली त्या व्यक्तीच्या तोंडून भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांवर ओकलेली गरळ अत्यंत हास्यास्पद आणि निषेधार्य आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी महायुतीचे आमदार आहात हे विसरू नये, आणि आपल्या जिल्हा प्रमुखांचे तोंड आवरा अन्यथा आगामी काळात आपल्या चेल्यांना आणि तुम्हालाही या गोष्टी महाग पडतील असा सज्जड इशाराही गायकवाड यांनी दिला आहे. महायुतीचा निर्णय मान्यच आहे. परंतु उमेदवारीवर भाजपाच्या एखाद्या पदाधिकाऱ्यांने दावा करणे यात गैर काय? असाही प्रश्न साहेबराव गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडाजंगी वाढणार… आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात नांदेड उत्तर मतदार संघातील इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार तयारी करीत आहेत. त्यात महायुतीकडून विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर पुन्हा रिंगणात राहतील, हे निश्चित. पण भाजपकडून मिलिंद देशमुख यांनीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरून असेच खटके उडत राहतील असेच चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!