
नांदेड – विष्णुपुरी येथील कै.शंकरराव चव्हाण सिंचन प्रकल्पातील १२ विद्युत पंप व उद्धरण नलिकेसाठी राज्य शासनाने १६० कोटी ६४ लाखांचा निधीस प्रशासकीय मंजुरी दिली आहे. विद्युत पंप आणि उद्धरण नलिकेची बिकट अवस्था झाल्याने लोहा व कंधार तालुक्यातील हजारो शेतकरी सिंचनापासून वंचित राहत होते, याबाबत लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. श्यामसुंदर शिंदे यांनी मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे याविषयी आवाज उठविला होता.
सिंचनाच्या समस्येमुळे लोहा तालुक्यातील १५ हजार ९२७ हेक्टर व कंधार तालुक्यातील २ हजार १०० हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहत होती. शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान होत होते. ‘धरण उशाशी, पण शेतकरी उपाशी’ राहत असल्याने या भागातील बळीराजा आर्थिक व मानसिकदृष्ट्या हवालदिल झाला होता. लोहा-कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी आ. शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे आवाज उठवला होता. त्यात कै. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे १२ विद्युत पंप व उद्धरण नलिका तात्काळ बदलण्यात येऊन नवीन विद्युत पंप व उद्धरणनलिका बसविण्याची मागणी अधिवेशनात केली होती. विद्युत पंप व उद्धरण नलिका दुरुस्तीसाठी निधी तात्काळ मंजूर केला होता. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या दि. २९ जुलै २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे विष्णुपुरी प्रकल्पातील १२ विद्युत पंप व उद्धरण नलिकेच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत १६० कोटी ६४ लाख ५७ हजार २२३ रुपये निधीस प्रशासकीय मान्यता दिली.
हा निधी उपलब्ध झाल्याने विष्णुपुरी प्रकल्पाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व नादुरुस्त झालेल्या १२ विद्युत पंप व उद्धरणनलिका आता नव्या कोऱ्या बसविल्या जाणार आहेत. विष्णुपुरी प्रकल्पाच्या विद्युत पंप व उद्धरण नलिका हा शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे शेतकरी बांधवात आनंदाचे वातावरण आहे.