
नांदेड – राज्यात सरकारकडून अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा यासह अकरा ते बारा योजना राज्यात राबविल्या जात आहेत. मात्र या योजनांबाबत विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातच पहिल्या टप्प्यात पात्र महिला लाभार्थ्यांना १३५ कोटी रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात ५ लाख महिला लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. त्यामध्ये साडेचार लाख अर्जांना मान्यता मिळाली आहे. रक्षाबंधनापूर्वी दोन महिन्याचे तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना थेट खात्यामध्ये दिले जाणार आहे. त्यामुळे या पात्र ठरलेल्या आणि थेट खात्यात रक्कम जमा झालेल्या महिला लाभार्थ्यांनी आपल्याला आलेला बँकेच्या एसएमएस विरोधकांना पाठवावा असे आवाहन त्यांनी केले. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता विरोधक या योजनेबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवीत आहेत तसेच अपप्रचार करत आहेत. या योजनेला सातत्याने विरोधकाकडून सावत्र वागणूक दिली जात आहे. पात्र महिलांना पंधरा हजार रुपये मिळू नये अशीच विरोधकांची भूमिका आहे. मात्र राज्य सरकारने रक्षाबंधनापूर्वी या योजनेअंतर्गत दोन हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या थेट खात्यावर टाकण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना जवळपास १३५ कोटी रुपये मिळणार आहेत. ज्या महिलांनी आतापर्यंत या योजनेअंतर्गत अर्ज भरले नाहीत त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज भरावे असे आवाहनही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल केली. संविधान बदलण्यात येणार, लोकशाही राहणार नाही असे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. तोच पॅटर्न विधानसभेतही आता विरोधक राबवित आहेत. मात्र आता लोक हुशार झाले आहेत. लोकसभेला जे झाले ते आता विधानसभेला होणार नाही असा असेही खा. अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले.