Police

नांदेडमध्ये पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत सव्वा पाच कोटींचा मुद्देमाल जप्त 

अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध अब तक ७५६ गुन्हे दाखल, १ हजार २१९ जणांविरुद्ध कारवाई

नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर परिक्षेत्रांतर्गत जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिले. याच काळात नांदेड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून अबिनाश कुमार यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या सव्वा महिन्याच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करताना नांदेड पोलिसांनी तब्बल ५ कोटी २६ लाख २ हजार ५९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अवैध धंदे करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ७५६ गुन्हे दाखल केले असून १ हजार २१९ आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे.

नांदेड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगस्ट २०२४ पासून ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ सुरू करीत अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या जुगार, मटका, गुटखा, वाळू, अंमली पदार्थ, रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्वतंत्र ६ पथके स्थापन केली. या पथकांनी तसेच जिल्ह्यातील काही ठाणे अधिकाऱ्यांनी मनावर घेत अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. नांदेड पोलिसांनी तब्बल ५ कोटी २६ लाख २ हजार ५९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध आतापर्यंत ७५६ गुन्हे दाखल केले असून १ हजार २१९ आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे.

‘ऑपरेशन फ्लश आऊट’मध्ये सर्वाधिक ४२२ गुन्हे हे अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध केले आहेत. यामध्ये ४४९ आरोपी निष्पन्न केले आहेत. जुगार खेळणारेही ५३० आरोपी पोलिसांना या कारवाईत आढळले आहेत. १५७ गुन्हे जुगाऱ्याविरुद्ध दाखल केले आहेत. ३१ गुन्ह्यांमध्ये ३९ आरोपी गुटखा विक्री करताना सापडले. नांदेड पोलिसांनी गुटख्यावरील कारवाईत ३१ लाख ३ हजार ४८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोवंशाची बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या ५३ जणांविरुद्ध २६ गुन्हे दाखल करून गोवंशाची होत असलेली तस्करी रोखली आहे. ५६ लाख ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गावठी पिस्तुलांसह इतर शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या २७ जणांविरुद्ध २५ गुन्हे दाखल करून ३ लाख २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी ९७ हजार ११२ रुपयांचे अंमली पदार्थही जप्त केले असून तिघांविरुद्ध तीन गुन्हे दाखल केले. कोप्टा अंतर्गत ५२ आरोपींवर ४७ गुन्हे दाखल करून ३ लाख ७८ हजार १७५ रुपयांचा मुद्देमालही पकडला आहे. एमपीडीएमध्ये एक कारवाई केली आहे.

वाळूमाफियांसह रेशनचा काळाबाजार करणारे धास्तावले..! जिल्ह्यात बिनदिक्कतपणे अवैध वाळू उपसा, वाहतूक सुरू होती. राजकारण्यांसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुनच हा कारभार केला जात होता. त्यात काही पोलीसही भागीदार होते. त्यामुळे कारवाई करायची कुणी हा प्रश्नच पुढे येत होता. मात्र उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘अशक्य ते शक्य’ करून दाखवताना ५१ वाळू माफियांवर कारवाई करीत ३८ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत तब्बल २ कोटी ५९ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. त्यामुळे वाळूचा बिनदिक्कतपणे सुरू असलेला अवैध धंदा आता थंडावला आहे. मात्र पावसाळ्यानंतर कारवाईची तीव्रता कितपत टिकून राहिल याकडेही लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेच्या तोंडातला घास काढून काळ्या बाजारात स्वस्त धान्य दुकानातील धान्य नेले जात आहे. पोलिसांनी धान्याचा काळा बाजारही रोखण्यासाठी कारवाया सुरू आहेत. सव्वा महिन्यात सहा कारवाया केल्या असून १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ७० लाख ५९ हजार ३६४ रुपयांचे धान्य जप्त केले आहे. त्यामुळे रेशनवरील स्वस्त धान्याच्या काळ्या बाजारालाही लगाम बसला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!