
नांदेड – महापालिकेने कोटीतीर्थ येथील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी सतत आठ दिवस केलेल्या अथक परिश्रमास अखेर यश आले आहे. कोटीतीर्थ येथील दोन पंप बुधवारी रात्री सुरू झाले आहेत. या पंपाद्वारे डंकीन येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा पोहचविण्यात आले. डंकीन येथून शहरातील दक्षिण भागाला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
सात दिवसाच्या अथक परिश्रमानंतर विष्णुपुरी येथील कोटीतीर्थ पंपगृहातील काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर नवीन जलवाहिन्याही टाकण्यात आल्या होत्या. जलवाहिन्यासह विद्युतीकरणाचे काम येथे पूर्ण झाल्यानंतर बुधवारी मध्यरात्री आवश्यक ती तांत्रिक चाचणी घेण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता दिलीप आरसुडे, उपअभियंता राजकुमार बोडके, कनिष्ठ अभियंता जकिऊल्ला खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. काम पूर्ण झाल्यानंतर डंकीन येथे पाणीपुरवठा करण्यात आला. ही चाचणी यशस्वी झाली आणि दुसरा पंपही सुरू करण्यात आला. या पंपाद्वारे डंकीन जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पोहोचवण्यात आले. शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दक्षिण नांदेडला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
डंकीन जलशुद्धीकरण केंद्रावरून पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदिर, वजीराबाद, जुना मोंढा, मारवाड गल्ली, दिलीपसिंग कॉलनी, गोवर्धन घाट, कालेजी टेकडी, गुरुद्वारा परिसर, महावीर चौक, कपडा मार्केट, शनी मंदिर परिसर, श्री रेणुका माता मंदिर परिसर, जुना मोंढा भाग, समीरा बाग, वाघी आदी भागांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. हा पाणीपुरवठा रोटेशननुसार होईल. दोन दिवसात या भागातील संपूर्ण पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
एक मे च्या मध्यरात्रीपासून डंकीन येथील तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. प्रामुख्याने उत्तर नांदेड या तांत्रिक बिघाडामुळे मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते. पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे सांगवी येथून पाणी सुरू करण्यात आले असले तरीही ते अपुरेच ठरत होते. त्यातच टँकरची कमी असलेली संख्या यामुळे शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना म्हणावे तितके यश मिळत नव्हते. त्यात नागरिकांचा संतापही पुढे येत होता. हा संताप व्यक्त होणे वावगे नव्हते. पण दुसरीकडे महापालिकेची यंत्रणाही अविरत कार्यरत होती. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी प्रत्येक अभियंत्यास आपापली जबाबदारी दिली होती. इतकेच नव्हे तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर नियोजनात जबाबदारी दिली होती. ही जबाबदारी त्या अधिकाऱ्यांनी कितपत पेलली हा वेगळा भाग असला तरी नियोजनात कोणतीही कमतरता राहू नये याची दक्षता आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी घेतली होती. दरम्यान, कोटीतीर्थ पंपगृहातील काम लवकरच पूर्ण होईल, त्याद्वारे संपूर्ण उत्तर आणि दक्षिण नांदेड शहराला पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. हा पाणीपुरवठा शुक्रवारपासून सुरळीत होईल असा विश्वासही आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी व्यक्त केला.