राजकीय

नांदेडमध्ये घोषणा लोकसभेच्या भाजप उमेदवाराची, चिंता काँग्रेसच्या विधानसभा उमेदवाराला

एकाच घरात दोन भावांना तिकिटे, फटका बसणार कोणाला..? आमदारकी काँग्रेसकडून तर खासदारकी भाजपाकडून लढविली जाणार, मतदार स्वीकारणार..!

नांदेड – विधान परिषदेच्या निवडणुकीत सातत्याने क्रॉस वोटिंगचा ठपका असलेले काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांना काँग्रेसकडून  पुन्हा एकदा नांदेड दक्षिण मतदारसंघाची उमेदवारी मिळाली खरी. मात्र आता भाजपाने नवा डाव टाकत त्यांच्याच घरात वादाची ठिणगी पेटवली आहे. काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांचे धाकले बंधू डॉ. संतुक हंबर्डे यांना नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उतरविले आहे. त्यामुळे आता एकाच घरात आमदारकी काँग्रेसकडून तर खासदारकी भाजपाकडून लढविली जाणार आहे. याच बाबीचा किता फटका बसणार याचा अंदाज काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांना आला आहे. त्यामुळे त्यांना सोमवारी नांदेडमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत मोहन हंबर्डे यांना आपण गद्दारी करणार नाही, आपण इमानदारीने काम करू आणि लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण यांना निवडून आणू, असा वारंवार खुलासा करावा लागला. त्यामुळे आता एकाच घरात दोन तिकिटाचे विरोधक किती भांडवल करतील हे आगामी प्रचारादरम्यान स्पष्ट होणार आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांची उमेदवारी तसेच नांदेड उत्तरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अब्दुल सत्तार आणि नांदेड दक्षिणचे उमेदवार मोहन हंबर्डे यांची उमेदवारी दाखल झाल्यानंतर सोमवारी दुपारी गुरुद्वारा मैदानावर महाविकास आघाडीची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची उपस्थिती होती. तर माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, काँग्रेसचे दुसरे जिल्हाध्यक्ष व मुखेडचे उमेदवार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, ईश्वरराव भोसीकर, भगवानराव आलेगावकर, प्रकाश मारावार, दत्ता कोकाटे, डॉ. मीनल खतगावकर आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री अमित देशमुख यांचाही नांदेडमधील सभेतून काढता पाय…
या सभेसाठी माजी मंत्री तथा काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनीही नांदेडचा धावता दौरा केला. मंचावर आगमन झाले असता यावेळी माजी मंत्री किन्हाळकर यांचे भाषण सुरू होते. हे भाषण संपताच माजी मंत्री अमित देशमुख यांनी भाषणाची सुरुवात केली. यावेळी देशमुख यांनी नांदेड लोकसभेच्या उमेदवारासह विधानसभेच्या सहा उमेदवारांचे वैशिष्ट्य त्यांनी सांगितले. त्यात मोहन हंबर्डे यांच्या नावाचाही उल्लेख होता. मात्र तत्पूर्वी अमित देशमुख यांचे भाषण होण्यापूर्वीच आपणास बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी देशमुख यांच्याकडे नांदेड दक्षिणचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी केली होती. देशमुख यांच्या उपस्थितीतच मोहन हंबर्डे यांना घरातील लहान भावाच्या उमेदवारीचा खुलासा करायचा होता. मात्र अमित देशमुख यांनी ही संधी त्यांना न देता स्वतःच भाषण सुरू केले. ही संधी न देण्यामागेही
 कोणते कारण होते काय, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून त्यांचे बंधू डॉ. संतुक हंबर्डे यांना जाहीर झालेल्या उमेदवारी बाबत अमित देशमुख यांना माहिती मिळाली होती. त्यामुळेच त्यांनी आपले भाषण सुरू केले आणि भाषणानंतर लगेच मंच सोडला.

मोहन हंबर्डे यांचा वारंवार खुलासा, भाजपने आपले घर फोडल्याचाही आरोप…

नांदेड दक्षिणचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी मात्र या सभेत भारतीय जनता पक्षाने आपले घर फोडल्याची टीका केली आहे. सत्तेसाठी भाजपाने राज्यातील अनेक घरे फोडले आहेत. त्यात आता आपल्या घराचाही समावेश झाल्याचे त्यांनी नमूद केले.  ही भाजपाची चाल आहे. गेल्या दहा वर्षापासून संतुकराव उमेदवारी मागत आहेत. मात्र त्यांना ती भाजपाने दिली नाही. आता माझी उमेदवारी झाल्यानंतर त्यांनी लगेच संतुकरावांची लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचा उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. त्यामुळे आता २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी क्रॉस वोटिंग होणार नाही, याची खबरदारी नांदेड दक्षिणच्या मतदारांनी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली.  दक्षिणचे मतदार ही खबरदारी घेतील असा विश्वासही व्यक्त केला. हा विश्वास व्यक्त करताना त्यांना आपण इमानदारीने काम करू आणि लोकसभेच्या उमेदवाराला निवडून आणू आपल्यापेक्षा जास्त मते प्रा. रवींद्र चव्हाण यांना दक्षिणमध्ये मिळतील असेही त्यांना वारंवार सांगावे लागले. एकूणच संतुकरावांच्या भाजपाच्या उमेदवारीनंतर मोहन हंबर्डे यांची मात्र आता गोची झाली आहे. या गोचीचा विरोधक निश्चितच फायदा उचलतील. त्यात काँग्रेसच्या काही इच्छुकांनी थेट नाना पटोले यांच्याकडे याबाबत तक्रार नोंदवली आहे. एकाच घरात दोन तिकिटे तेही भाजपाच्या उमेदवाराला एक तिकीट आणि काँग्रेसच्या उमेदवाराला एक तिकीट ही परिस्थिती आहे. त्यामुळे याचा नेमका फायदा कोणाला होईल असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!