
नांदेड – शहरातील आनंदनगर येथे असलेल्या राजमॉलमध्ये बुधवारी झालेल्या सतरा वर्षीय युवकाच्या खून प्रकरणाची व्याप्ती आता वाढली असून चार तरुणांसह एका महिलेचाही आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
शहरातील आनंदनगर येथे २२ जानेवारी रोजी सायंकाळी साईनाथ प्रकाश कोळेकर या १७ वर्षीय युवकाला चाकूने भोसकून जीवे मारण्यात आले होते. सुरुवातीला साईनाथला थापड बुक्क्याने मारहाण करून एका आरोपीने धारदार खंजरसारख्या शस्त्राने पाठीमागील बाजूस मांडीमध्ये खंजीर खुपसून जखमी केले होते. यात साईनाथचा जागेवरच मृत्यू झाला होता. या खुनानंतर आरोपी फरार झाले होते. या आरोपीना विमानतळ पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून उचलले. त्यांना शुक्रवारी नांदेडमध्ये आणले.
घटनेच्या दोन दिवसाआधी साईनाथच्या एका लहान भावाला यातील एका आरोपीने मारहाण केली होती. या मारहाणीचा जाब साईनाथने विचारला होता. हीच बाब मनात ठेवून एका आरोपीने इतर आरोपींना एकत्र आणून साईनाथला मारहाण केली; त्याच्यावर चाकू हल्ला केला त्यातच साईनाथचा जीव गेला.
जुन्या वादातून खुनाचा हा गंभीर प्रकार घडला असल्याचे सांगितले जात असले तरी यामध्ये मूळ कारण पोलिसांनी शोधून आता तपासाची चक्र गतिमान केले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण हे करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1), 115 (2), 352, 351 (2), 351 (3), 3 (5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात नांदेड उपविभागाचे प्रभारी अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी तपासाची चक्र फिरवत अधिक सखोल चौकशी केली. त्यामध्ये या घटनेतील एका आरोपीच्या आईला सदर प्रकरणाबाबत माहिती होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पर्यवसान गंभीर घटनेत होईल याबाबत सदर महिलेला कल्पना होती. त्यामुळे त्या महिलेलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. चार तरुणांसह एका महिलेचा आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची गुंतागुंत आता वाढत चालली आहे.