
नांदेड – देशात सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केले आहे. २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर नांदेडचे फुल सत्तेत पोहोचले नव्हते आता तरी ते पाठवा अशी विनंती भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये येऊन केली होती. मात्र एक नव्हे तर दोन खासदार जिल्ह्यात असलेला भारतीय जनता पक्ष आणि महायुती पंतप्रधानांनी केलेली ही विनंती दुसऱ्यांदाही पूर्ण करू शकले नाहीत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला नांदेडमध्ये सलग दुसऱ्यांदा काँग्रेसकडून मात खावी लागली आहे.
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुका आणि नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी घोषित झाला. या निकालात नांदेड जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व नऊ जागेवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. मात्र नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्रा. रवींद्र चव्हाण हे निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपाला हा पराभव निश्चितच जिव्हारी लागणारा ठरला आहे. या पराभवाचे कारण शोधावे लागणार आहे. काँग्रेसने निसटता विजय मिळवला असला तरी शेवटी तो विजयच ठरला आहे. महायुतीच्या महालाटेत नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडी संपूर्णतः उध्वस्त झाली मात्र लोकसभेच्या एका निकालाने काही अंशी का होईना काँग्रेस आणि महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी भाजपातील अंतर्गत कुरघोडीमुळे डॉ. संतुक हंबर्डे यांना विजय मिळवता आला नाही, ही बाबही आता पुढे येत आहे.
देशात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी नावाची सुनामी आली होती. या सुनामीत काँग्रेसचे बडे बडे नेते नेस्तनाबूत झाले होते मात्र या वादळातही नांदेडमध्ये लोकसभेवर काँग्रेसकडून अशोकराव चव्हाण हे निवडून आले होते. त्यांनी भाजपाचे डी.बी पाटील यांचा तब्बल ८१ हजार ४५५ मतांनी पराभव केला होता. महाराष्ट्रातून केवळ दोन खासदार संसदेत पोहोचले होते. त्यामध्ये नांदेडचे अशोकराव चव्हाण आणि हिंगोलीचे राजीव सातव यांचा समावेश होता. पुढे २०१९ च्या निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांचा भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पराभव केला होता. या निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांना ४ लाख ८६ हजार ८०६ मते मिळाली होती तर अशोकराव चव्हाण यांना ४ लाख ४६ हजार ६५८ मते मिळाली होती. चिखलीकर हे ४० हजार १४८ मतांनी विजयी झाले होते.
२०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय चित्र बदलले होते. नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय लोकसभा निवडणुकीत निश्चित मानला गेला होता. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे विजयाचे गणित मांडले जात होते मात्र हे गणित पूर्णतः बिघडले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे असलेले प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांनी एकत्रपणे प्रचार केला. तरीही प्रतापराव पाटील चिखलीकर हे दुसऱ्यांदा खासदार होण्यात अपयशी ठरले. त्यांना काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत ५९ हजार ४४२ मतांनी वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये जाहीर सभा झाली होती. या सभेतही त्यांनी भाजपा उमेदवाराच्या विजयाचे आवाहन केले होते. पुढे लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसातच काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक घ्यावी लागली. ही लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच घेण्यात आली. या दोन्ही निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा ९ नोव्हेंबर रोजी नांदेड येथील कौठा भागातील मोदी मैदानावर सभेसाठी आले. त्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा नांदेडकरांपुढे केंद्रातील सत्तेत नांदेडचे फुल पोहोचले नसल्याची खंत व्यक्त करत आता तरी नांदेडचे फुल सत्तेत पाठवा असे जाहीर आवाहन केले होते. सत्तेतील पक्षाचा खासदार असेल तर विकासाला गती मिळते असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
नांदेडची भाजपा त्यांच्या या आवाहनाला दुसऱ्या वेळीही योग्य तो प्रतिसाद देऊ शकली नाही हे उल्लेखनीय आहे. नांदेडमध्ये राज्यसभेवरील दोन खासदार असताना नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्रा. रवींद्र चव्हाण यांना ५ लाख ८६ हजार ७८८ मते मिळाली तर भाजपाचे डॉ. संतुक हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार ३३१ मते मिळाली. १ हजार ४५७ मतांनी प्रा. रवींद्र चव्हाण हे विजयी झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडमधून यावेळी तरी फुल केंद्रात येईल, अशी व्यक्त केलेली अपेक्षाही फोल ठरली आहे.