राजकीय

नांदेडच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

अडीच वर्षात नांदेड उत्तर मतदारसंघात अडीच हजार कोटींचा निधी 

नांदेड – महाविकास आघाडीच्या काळात बालाजी कल्याणकर यांना एक रुपया निधी मिळाला नव्हता, मात्र महायुतीच्या काळात दोन वर्षात कल्याणकर यांनी तब्बल २५०० कोटींचा विकास निधी आणला. यापुढेही नांदेडच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नांदेडमध्ये  दिली. नांदेड उत्तर मतदार संघात ७० हजार लाडक्या बहिणींना पाच महिन्यांचे पैसे दिले. लाडकी बहीण बंद पडू देणार नाही असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.
नांदेड उत्तर विधानसभेतील महायुतीचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मुंबई, ठाण्यानंतर बाळासाहेबांनी मराठवाड्यावर प्रेम केले. शिवसेना आणि मराठवाड्याचे वेगळे नाते आहे. इथले अनेक कार्यकर्ते, नेते बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झाले. राज्यात लाडकी बहीण योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे. मात्र काँग्रेस, उबाठा आणि तुतारीचे लोक या योजनेच्या विरोधात केले आणि कोर्टात गेले मात्र कोर्टाने त्यांना फटकारले.  या योजनेत महिलांना १५०० रुपयांवर ठेवणार नाही. त्यांना लखपती करायचे आहे. कोणीही आले तरी लाडकी बहिण योजना बंद करणार नाही, असा पुनरुच्चार केला. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, राजस्थानमध्ये निवडणुकीत काँग्रसने खोटी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि जनतेची फसवणूक केली, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
लाडके भाऊ, ज्येष्ठ नागरिक, शेतकऱ्यांसाठी महायुतीच्या वचननाम्यात १० आश्वासने दिली आहेत. यात महायुती सरकारने लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्याचा निर्णय घेतलाय, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वर्षाला १५ हजार रुपये, वृद्धांचे पेन्शन २१०० रुपयांपर्यंत वाढवणार, प्रत्येकाला अन्न आणि निवारा देणार, २५ लाख रोजगार आणि १० लाख तरुणांना १० हजार रुपयांना दरमहा प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मतदारांना केले.
महायुती सरकारने दोन वर्षांत शेतकऱ्यांना १५ हजार कोटींची मदत केली. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्धार आम्ही केलाय. सोयबीन खरेदी केंद्र वाढवणार आहोत. किमान आधारभूत किंमतीतील तफावत भरुन काढण्यासाठी सरकारकडून भावांतर योजना लागू केली जाईल, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भोकर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्यासाठीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुदखेड तालुक्यातील बारड येथे प्रचार सभा घेतली. या सभेत बोलताना ते म्हणाले, खासदार अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये आहेत. ते या राज्याचे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना अनुभव आहे. यातून नांदेड जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. आपले सरकार वेदना, संवेदना आणि गरिबीची जाण असणारे सरकार आहे.
अडीच वर्षात घरात बसून फेसबुकने लाईव्ह करुन सरकार चालवले. सगळे मोठे प्रकल्प बंद केले. कामात स्पीडब्रेकर घालून जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटरग्रीड, मेट्रो असे अनेक प्रकल्प बंद होते. मात्र महाराष्ट्रविरोधी सरकार आम्ही उलथवून टाकले, स्पीडब्रेकर उखडून टाकले आणि महायुतीचे सरकार आणले. एकीकडे विकास कामे आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनांमधून राज्याला प्रगतीपथावर आणले, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले २००४ ते २०१४ या दहा वर्षात केंद्रातील काँग्रेस सरकारने महाराष्ट्राला केवळ २ लाख कोटींचा निधी दिला होता. मात्र २०१४ ते २०२४ या मोदीजींच्या १० वर्षांच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला तब्बल १० लाख कोटी दिले. दुप्पट नाही पाच पट निधी केंद्र सरकारने दिला, असे ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही यावेळी नांदेडचा विकास थांबू देणार नसल्याचे सांगितले. त्याचवेळी नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ॲड. श्रीजया चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नऊ उमेदवारांना आणि लोकसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ संतुक हंबर्डे यांना विजयी करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!