
नांदेड – काल पक्षात आलेल्या लोकांना आमदार, मंत्री केले जात आहे. ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिव्या दिल्या, त्यांनाही पक्षात घेऊन सन्मानाची पद दिली जात आहेत. परंतु वर्षानुवर्ष भाजपाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र पक्षात न्याय मिळत नाही. हा अन्याय किती दिवस सहन करायचा, या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे. पक्षाला याबाबत आता निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा वेगळा निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका भाजपाचे महाराष्ट्र सचिव देविदास राठोड यांनी व्यक्त केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राठोड यांची ही आक्रमक भूमिका भाजपासाठी चिंतेची बाब ठरली आहे.
दिवंगत भाजपाने ते गोपीनाथराव मुंडे यांच्या तालमीत वाढलेल्या आणि जवळपास ३० वर्षाहून अधिक काळ पक्षाचे एकनिष्ठपणे काम करणाऱ्या देविदास राठोड यांनी दोन दिवसापूर्वी एक मेळावा घेत पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांच्याशी ‘नांदेड स्क्रिप्ट’ ने संवाद साधला असता राठोड यांनी स्पष्टपणे आपली मते मांडली आहेत. ते म्हणाले, तीस वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचे काम करत आहे. मात्र पक्ष नेतृत्वाने आपल्यावर सातत्याने अन्याय केला आहे. हा अन्याय आणखी किती दिवस सहन करायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. अन्यायाविरुद्ध बोलणाराच पक्षाचा खरा कार्यकर्ता असतो असे त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसापूर्वी झालेल्या समाजाच्या मेळाव्यात लोकांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. या भावनांची नेतृत्वाने दखल घेणे गरजेचे आहे. भाजपा नेतृत्वाने समाजातील लोकांशी बोलले पाहिजे, त्यांची मते जाणून घेतली पाहिजेत. समाजाची मते ऐकून आता पक्षालाच निर्णय घ्यायचा आहे, अन्यथा आता वेगळा निर्णय घ्यावाच लागणार आहे.
दुसरीकडे पक्षात वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. भारतीय जनता पक्ष आता अटलजी, आडवाणींचा पक्ष राहिला नाही, हा समज वाढतच चालला आहे. काल येतो आणि तो आमदार, मंत्री होतो. मात्र वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते बाजूलाच राहत आहेत. ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिव्या दिल्या त्यांनाही पक्षाने मोठे केले आहे. मोठ मोठी पदे दिली आहेत. दुसरीकडे खऱ्या आणि मूळच्या भाजप कार्यकर्त्यांना कोणीही विचारात घेतले नाही. त्यामुळेच नांदेड लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागला असेही त्यांनी स्पष्ट केले. पारंपरिक मतदार भाजपापासून दूर जात आहे. पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांना कोणीही विचारत नाही. त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत. त्यामुळे लोकसभेला फटका बसला. पक्षाच्या कार्यकर्त्याचा वापरच करीत असाल तर आता गप्प बसणार नाही, वेगळा निर्णय घेतला जाईल असेही राठोड यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपण नांदेड जिल्ह्याचे प्रभारी आहोत. आपण पक्षाकडे आपल्या उमेदवारीची मागणी केली नाही. मात्र योग्य उमेदवाराचे नाव पक्षाकडे पाठविले आहे. आपण पाठवलेल्या नावाल पसंती दर्शवली आणि उमेदवारी दिली तर त्या उमेदवाराला निवडून आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पक्षाला किती फायदा झाला, नुकसान झाले याचा पक्षाने विचार करावा. त्यांच्या भाजप प्रवेशाचे आपण स्वागत केले आहे. अशोकराव हे मोठे नेते आहेत, त्यांच्या निर्णयाबाबत आपण काहीही बोलणार नाही असेही त्यांनी सांगितले.
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली नसल्याचे देविदास राठोड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र विधानसभेला राज्यभरातून बंजारा मतदार बहुल कोणत्याही मतदारसंघात संधी दिली तर आपण विजय खेचून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता असली तरी केंद्रातल्या कोणत्याही कमिटीवर संधी देता येते त्यामुळे याचा पक्ष नेतृत्वाने विचार करणे गरजेचे आहे.
गेली अडीच वर्षाच्या सत्तेच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते तसेच अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांनी पाच दहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दहा लाखांचाही निधी मिळत नाही. ही एक शोकांतिकाच आहे. थेट गुत्तेदारांनाही निधी देण्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. त्यामुळे पालकमंत्र्याकडून नांदेडमध्ये काय काय करण्यात आले ही बाब वेगळी असली तरीही सामान्य कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यास आता वेगळा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे नेते देविदास राठोड यांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका भारतीय जनता पक्षासाठी नांदेड जिल्ह्यात किती नुकसानकारक ठरू शकते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. याबाबत वरिष्ठांकडून राठोड यांची मनधरणी होत असली तरीही न्याय न मिळाल्यास मात्र आपण वेगळा विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.