
नांदेड – शेतमजुरीसाठी घरातून सकाळी सात वाजताच बाहेर पडलेल्या ११ मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर शेतात पोहोचल्यानंतर थेट विहिरीत कोसळले. या अपघातात जवळपास सात महिलांना जलसमाधी मिळाली असून या अपघातप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे…नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे आज शुक्रवारी सकाळी ११ महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हिंगोली जिल्ह्यातील गुंज येथील या महिला होत्या आणि शेतीकामासाठी त्या जात होत्या. त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. २ महिला आणि एक पुरुष या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल.
दरम्यान, या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिघांना वाचविण्यात यश आले आहे. यात एका पुरुषासह दोन महिलांचा समावेश आहे. घटनेतील ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले.