
नांदेड – शहरवासीयांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने सेवा देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. २८ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेने चार वाहनांसह शिशुगृह तसेच २८ सेवा नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने देण्यास केलेला प्रारंभ हा निश्चितच कौतुकास्पद असून महापालिका यापुढेही आपल्या सेवांमध्ये निश्चितपणे वाढ करेल असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केला. त्याचवेळी महापालिका आणि पोलीस विभागाचा समन्वय सातत्याने असणे आवश्यक आहे अशी स्पष्टोक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली.
नांदेड महापालिकेचा २८ वा वर्धापन दिन २६ मार्च रोजी साजरा करण्यात आला. नांदेड महापालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महापालिकेच्या वतीने चार वाहनांचे लोकार्पण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचवेळी महापालिकेत शासन निर्देशानुसार उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या वतीने २८ सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना देण्याचा प्रारंभही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना राहुल कर्डिले म्हणाले, महापालिकेने दररोज पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे. त्याचवेळी वृक्षारोपणाचे प्रमाणही निश्चितपणे शहरात वाढले आहे. आगामी काळातही वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केले जाईल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात महापालिकेने मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे. महापालिकेत वेटिंग कक्ष उभारण्यात आले आहेत. हिरकणी कक्षही सुरू केला आहे. त्यामुळे लोकाभिमुख महापालिका आता मूलभूत सुविधांसह नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. निश्चितच ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांचा समन्वय सातत्याने राखणे आवश्यक आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था यासह गुन्हेगारी कमी होण्यातही महापालिकेची भूमिका निश्चितच मोलाची असल्याचे स्पष्ट केले. शहरात स्वच्छ आणि सुंदर वातावरण असेल तर निश्चितच गुन्हेगारी कमी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासाठी त्यांनी ब्रोकन विंडोज सिस्टिम या गुन्हेगारी सिद्धांताचा दाखला दिला. शहरातील दिवाबत्ती योग्य पद्धतीने राहिल्यास लहान मोठे गुन्हे कमी होतील असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनीही वाढत्या शहरीकरणात महापालिकेची भूमिका निश्चितच मोलाची असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेअंतर्गत येणारा ग्रामीण भाग आता मोठ्या प्रमाणात महापालिकेत समाविष्ट होत असल्याने महापालिकेच्या कार्य कक्षांकडे आमचे निश्चितच लक्ष राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले. वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
वर्धापन दिन कार्यक्रमात महापालिकेच्या एम्प्लॉय ऑफ मंथ आणि ऑफिसर ऑफ मंथ या पुरस्काराचेही वितरण करण्यात आले. त्याचवेळी महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण आणि आरोग्य विभागातील आशा सेविकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुमेध बनसोडे यांनी केले.
महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी प्रास्ताविकात महापालिकेच्या २८ वर्षाच्या वाटचालीचा आढावा सादर केला. यामध्ये महापालिकेची दरवर्षी होत असलेली प्रगती त्यांनी विशद केली. त्याचवेळी आगामी काळात महापालिकेने केलेले संकल्पही त्यांनी सांगितले. या संकल्पामध्ये प्रतिदिन पाणीपुरवठा तसेच प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणीपुरवठा, हिरकणी कक्ष, नागरिकांना कर सवलती, ऑनलाइन सेवा सुविधा, ई ऑफिस या बाबींचा आवर्जून त्यांनी उल्लेख केला.