
नांदेड – नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात महिला मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. संपूर्ण जिल्हाभरात कठडे नसलेल्या विहिरींची नोंद घेऊन त्या विहिरीभोवती अडथळे निर्माण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रामुख्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींची नोंद घेतली जाणार आहे
आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये सात निष्पाप जीवांचे बळी गेल्यामुळे अशा अपघात प्रवण विहिरी जिल्ह्यामध्ये किती आहेत त्यांचा शोध घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला सूचना दिली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना या संदर्भात सर्व यंत्रणेकडून याबाबतचा अहवाल मागितला आहे. नागरिकांनी अशा धोकादायक, रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींबाबत सतर्कता बाळगावी व विहिरीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने दुर्घटना होणार नाही, यासंदर्भात अडथळे उभारावेत अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.