नांदेड – हदगाव तालुक्यातील तामसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेस कारणीभूत असलेले राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी हटविण्यात आले. त्यामुळे तामसा येथील स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत दिलेल्या लढ्याला अखेर यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. १८ एप्रिल रोजी काढलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेत २५ ते ३० दुकाने, हातगाडे हटविण्यात आले आहेत.
तामसा येथे १७ एप्रिल रोजी शांतता समितीची बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ आय वर तामसा येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी १८ एप्रिल रोजी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सुरेश हटकर यांच्यासह शाखा अभियंता संजय गादा, स्थापत्य अभियंता सूर्यवंशी, गुदाले तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाट्यासह राष्ट्रीय महामार्गावरील हे अतिक्रमण हटवण्यात आले. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
हदगाव तालुक्यातील तामसा येथे १३ एप्रिलच्या सायंकाळी बुद्ध विहारासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे बॅनर लावताना राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण केलेल्या दुकानदारांनी हे बॅनर लावण्यास विरोध केला होता. इतकेच नव्हे तर बॅनर फाडल्याचाही प्रकार घडला होता. त्यानंतर येथे दोन गट आमने-सामने आले होते. त्यामुळे येथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शांतता प्रस्थापित केली. या घटनेप्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील जवळपास १४० हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच घटनेत १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना दलित बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. कोणतेही कारण नसताना बौद्ध नागरिकांवर दाखल करण्यात आलेले दरोड्याचे खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी करण्यात आली. या अतिक्रमणामुळेच वादाला तोंड फुटले होते तसेच वारंवार येथे अतिक्रमणधारक वाद करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राज्य सचिव महादेवी मठपती, रिपाइंच्या महिला आघाडीच्या सचिव वैशाली हिंगोले यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशाराही दिला होता.
त्यांची एकूणच ही आक्रमक भूमिका पाहता निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी हदगाव तहसीलदार यांना तात्काळ शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १७ एप्रिल रोजी तामसा ग्रामपंचायत येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे, भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तामसा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर, तामसाचे सरपंच रमेश घंटलवाड, भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राज्य सचिव महादेवी मठपती आदी उपस्थित होते.
या बैठकीत शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक धरणे यांनी केले. त्याचवेळी तामसा येथे राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यात येईल अशी घोषणाही तहसीलदार सुरेखा नांदे यांनी केली होती.त्यानुसार १८ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग यांच्या संयुक्त कारवाईत हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे जवळपास २५ ते ३० दुकाने हातगाडे या रस्त्यावरून हटवण्यात आले आहेत.
यापुढे या रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये याची प्रमुख जबाबदारी ही स्थानिक ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे तामसा ग्रामपंचायतीने आता या रस्त्यावर अतिक्रमण होऊ देऊ नये, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेले इन्फ्रास्ट्रक्चर वापरायचे आणि असे वादाचे प्रसंग उभे राहताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवायचे हा प्रकार चुकीचा असल्याचेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सुरेश हटकर यांनी सांगितले. याबाबत ग्रामपंचायतला पत्र दिले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती मात्र पुन्हा अतिक्रमण जैसे थेच झाले. आता यापुढे राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.