प्रशासकीय

नांदेडमध्ये महावीर चौक-वजिराबाद मुथा चौक-रेल्वे स्टेशन रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई, ९० अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन तब्बल २ ट्रक माल जप्त

नांदेड :- महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या विशेष मोहिमे अंतर्गत शनिवारी उत्तर नांदेड भागातील मुख्य बाजारपेठ आणि रहदारीसाठी महत्त्वाचा रस्ता म्हणुन ओळखला जाणारा महावीर चौक-वजिराबाद मुथा चौक-रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेने धडक कारवाई केली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक व पोलीस प्रशासनाने या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण हटविले आहे. त्याचवेळी बाफना टी पॉइंट ते देगलूर नाका या परिसरातील अतिक्रमणे महापालिकेने पुनश्च एकदा काढून टाकली आहेत.

शहरात काही दिवसांपासुन महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमणधारकांवर कारवाई सुरु आहे.  शनिवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने आपला मोर्चा नांदेड शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या वजिराबाद भागाकडे वळविला आहे. त्याअनुषंगाने या भागातील महावीर चौक-वजिराबाद मुथा चौक-रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकण्याची कारवाई महानगरपालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पार पाडली आहे. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने जवळपास ९० अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली. तब्बल ०२ ट्रक माल जप्त करण्यात आला आहे.  बाफना टी पॉइंट परिसरातील संगम कार बाजार व गुड ऑटो डील्स या दुकानदारांनी चार चाकी वाहने रस्त्यावर विक्रीसाठी ठेवून रहदारीस अडथळा केल्यामुळे संबंधित व्यवसाय धारकावर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सदरील कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने पार पाडली. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक कदम, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जसपालसिंग, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, राजेश जाधव, गौतक कवडे, अग्निशमन अधिकारी के. जी. दासरे, अतिक्रमण पथक प्रमुख अनिल चौदंते यांच्यासह महापालिकेचे ५० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील ४० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

महानगरपालिका हद्दीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता रहदारीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्ते अथवा इतरत्र अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. यापुढेही महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरुच राहील असे यावेळी मनपा उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांनी स्पष्ट केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!