
नांदेड – जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी दुपारी हदगाव तालुक्यातील वरवट येथे ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने गावानजीक असलेल्या नाल्याला पूर आल्याने गावातील मायलेकीसह पुतणी वाहून गेल्याने या तिघींचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गावकऱ्यांसह प्रशासनाने शोध मोहीम हाती घेतल्यानंतर काही वेळात या तिघींचेही मृतदेह आढळले असून या घटनेनंतर वरवट गावावर अक्षरशः शोककळा पसरली आहे.
जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात वरवट येथे मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाले वाहू लागले. त्यामध्ये अरुणा बळवंत शकर्गे वय ३७ वर्ष, दुर्गा बळवंत शकर्गे वय १० वर्षे या मायलेकी आणि समीक्षा विजय शकर्गे वय ७ वर्ष ही पुतणी नाल्याच्या पाण्यात वाहून गेली. या मायलेकीसह पुतणीचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांसह प्रशासनाने युद्धपातळीवर शोध सुरू केला. सायंकाळी ४.४५ च्या सुमारास पहिल्यांदा दुर्गा ही १० वर्षीय मुलगी आढळली. त्यानंतर काही वेळातच अरुणा आणि समीक्षा या दोघींचाही मृतदेह गावानजीकच आढळला. या घटनेनंतर वरवट येथे एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संपूर्ण वरवट गाव शोक सागरात बुडाले आहे. घटनास्थळी हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदेड यांनी भेट दिली आहे.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे. या गंभीर घटनेप्रकरणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने संपर्क होऊ शकला नाही.