
नांदेड – लेखी परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखत, सेवा अभिलेखांची तपासणी यासह पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या अभिप्रायानंतर नांदेड जिल्हा पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हा शाखेत २० नवे शिलेदार नेमण्यात आले आहेत. या शिलेदारांची नेमणूक जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केली आहे. या नव्या शिलेदारांकडून आता दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बदल्या केल्या आहेत. या ठिकाणी नव्या कर्मचाऱ्यांची निवड कशी होईल याकडेही लक्ष लागले होते. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती पाहिजे असेल तर ही नियुक्ती गुणवत्ता आणि कामगिरीच्या आधारावरच केली जाईल, असे स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर यासाठी परीक्षाही घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल आता पुढे आला असून स्थानिक गुन्हा शाखेत वीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये नांदेड ग्रामीण ठाण्यात कार्यरत असलेले श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड, माधव माने, ज्ञानेश्वर कलंदर, सुनीलदत्त गटलेवार, वजीराबाद ठाण्यातील कार्यरत इमरान शेख, मनोज राठोड, पोलीस मुख्यालयातील अनिल बिरादार, रितेश कुलथे, गोविंद येईलवाड, आबाराव पिंगलवाड, मुदखेड ठाण्यातील विनायक मठपती, इतवारा ठाण्यातील ज्ञानोबा कवठेकर, मोहन हाक्के, उमर शेख, विमानतळ ठाण्यातील दारासिंग राठोड, शिवाजीनगर ठाण्यातील अझरोद्दीन शेख, जिल्हा विशेष शाखेतील दिलीपकुमार चंचलवार, भोकर ठाण्यातील प्रमोद जोंधळे आणि कुंडलवाडी ठाण्यातील संजय चापलवार यांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हा शाखेत नव्याने नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक पाच कर्मचारी हे नांदेड ग्रामीण ठाण्यातील आहेत तर पोलीस मुख्यालयातील चार, इतवारा ठाण्यातील तीन आणि वजीराबाद ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांचा या नियुक्तीमध्ये समावेश आहे. याच नियुक्ती आदेशात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी बॉम्बशोधक व नाशक पथकातही तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये रवींद्र राठोड, सचिन घोगरे आणि अनिल कोलते या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे
स्थानिक गुन्हा शाखा आणि अवैध धंदे यांचा नेहमीच या न त्या माध्यमातून संबंध जोडला जातो. त्यात स्थानिक गुन्हा शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणूका या नेहमीच चर्चेत असतात. नांदेड जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेला यशाच्या शिखरावर नेण्याचे काम तत्कालीन पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी केले होते. त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्या अगदी राज्यस्तरापर्यंत गाजल्या होत्या. स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची मिळवण्यासाठी झालेले वाद अलीकडील काळापर्यंत सुरूच आहेत. जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेला सर्वाधिक काळ चिखलीकर यांनी काम केले. या काळात अनेक मोठ्या प्रकरणांचा छडा लागला. त्यानंतर आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांची नियुक्तीही औट घटकेची ठरली. तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची मर्जी डावलून स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर विराजमान झालेले पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या कार्यकाळात म्हणावी तशी मोठी कामगिरी अद्यापही पुढे आली नाही. उदय खंडेराय यांची टीम कोणत्या कामात व्यस्त राहिली, हाही संशोधनाचाच विषय आहे. १५ जून रोजी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नियुक्ती केलेल्या २० शिलेदारांना घेऊन आता स्थानिक गुन्हा शाखा यापुढे तरी किती प्रभावी कामगिरी करते याकडेही लक्ष लागले आहे.