
नांदेड – नांदेड महापालिका आणि तहसील कार्यालय प्रशासन हे खऱ्या पूरग्रस्तांना मदत न करता बोगस लाभार्थ्यांना मदत देत असल्यामुळे खरे लाभार्थी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी केला आहे. यादव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी खऱ्या पूरग्रस्तांच्या वतीने महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची दखल स्वतः जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेऊन तहसीलदार आणि महापालिका आयुक्त यांना आदेश दिले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी लगेच पूरग्रस्तांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत दिल्या जाईल असे आंदोलनकर्त्यांना आश्वस्त केले.
मंत्रीपदाच्या दर्जा असलेले आणि शिवसेना शिंदे गटाचे मराठवाड्याचे उपनेते हेमंत पाटील, दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख विनायक गिरडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णाभाऊ साठे चौक ते महापालिका कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. खऱ्या पूरग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. स्थानिक महापालिका आणि तहसील कार्यालय यांच्याकडून खऱ्या पूरग्रस्तांना, गोरगरिबांना मदत न देता बोगस लाभार्थ्यांना मदत दिली जात असल्याचा आरोपही यावेळी केला आहे. पूरग्रस्तांच्या यादीत खऱ्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
खऱ्या पूरग्रस्तांना मदत न दिल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नांदेड शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी दिला आहे. या मोर्चात संपर्कप्रमुख दत्तात्रय पईतवार, जिल्हा संघटक शंकर पिनोजी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीता पुरोहित, वनमाला राठोड, उपजिल्हाप्रमुख बिल्लू यादव, शहरप्रमुख सिडको सुहास खराणे, शिवसेना उपशहर प्रमुख गजेंद्रसिंह ठाकूर, युवा सेना रामेश्वर काळे, विजय यादव, महिला आघाडीच्या शहर प्रमुख लक्ष्मीताई दुधे, लताताई चिंचोलीकर, उपशहर प्रमुख स्वराज यादव, प्रकाश जोंधळे, अभि यादव, दुर्गेश बागडे, रमेश रौत्रे, बालराज वसरणीकर, गजू शास्त्री यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



