
नांदेड – संविधानाच्या अवमानना प्रकरणातून परभणीत निर्माण झालेली परिस्थिती पाहता नांदेडमध्ये पोलीस दलाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान उद्या गुरुवारी नांदेड शहरातील काही संघटनांच्या वतीने परभणी घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली जाणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीने बुधवारी या घटनेचा निषेध केला.
परभणी येथे सोमवारी संविधान अवमाननेचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी मोर्चा काढला मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. परभणीतील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे खुद्द परभणीतील रस्त्यावर उतरले. त्यामुळे काही काळानंतर परभणी शहरात शांतता निर्माण झाली. परभणीत संचारबंदी तसेच सर्व इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. सध्या परभणीमध्ये शांतता आहे. या घटनेचे पडसाद इतरत्र कुठेही उमटू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
दरम्यान, आज बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेडमध्ये परभणी घटनेचा निषेध करण्यात आला. या प्रकरणातील प्रमुख आरोपींना शोधून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी राज्य प्रवक्ते फारूख अहमद, राज्य कार्यकारणी सदस्य अविनाश भोसीकर, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, डॉ. संघरत्न कुरे, श्याम कांबळे, विठ्ठल गायकवाड, आयुब पठाण, चंद्रकला चापलकर, शुद्धोधन गायकवाड, अमृत नरंगलकर, सुहास जोंधळे, अंकुश थोरात आदींनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
नांदेडमध्येही पोलीस दलाकडून बुधवारी सामाजिक संघटनांशी संवाद साधण्यात येत होता. त्याचवेळी समाजातील विविध घटकांशी चर्चा करून सौहार्द कायम ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ परभणी घटनेच्या निषेध करण्यात येणार आहे. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या घटनेतील दोषींना दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेता तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेदारांना आवश्यकता सूचना दिल्या आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी काळजी घेण्याच्या तसेच समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही जिल्ह्यात शांतता कायम ठेवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.