
नांदेड : जिल्ह्यात १६ मार्चपासून आचारसंहितेचा अंमल सुरू झाला आहे. या चारच दिवसांच्या कालावधीत तपास यंत्रणांनी बेनामी रक्कम, मद्यसाठे आदी बाबींवर करडी नजर ठेवत तब्बल ४४ लाखांची रोकड, ७ लाखांचे मद्य आणि १६ लाखांचे इतर साहित्य जप्त केले आहे.
निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बुधवारी नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात चार दिवसांच्या कालावधीत झालेल्या कारवायांची माहिती देण्यात आली. ४४ लाख रुपये रोख, ७ लाखांचे मद्य आणि १३ लाखांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले. या झालेल्या कारवायांबाबत यंत्रणांनी जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले. बैठकीस अंमलबजावणी संचालनालय, इन्कम टॅक्स, परिवहन, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, प्राप्तीकर, महसुल, अंमली पदार्थ नियंत्रण दल, सिमा सुरक्षा बल, अंमलबजावणी संचालनालय, परिवहन, डाक विभाग, नागरी उडयन विभाग आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात कडेकोट तपासणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असून या यंत्रणांनी कोणाचीही हयगय न करता जप्ती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या कालावधीसाठी ‘इलेकशन सिझर मॅनेजमेंट सिस्टीम ॲपची निर्मिती आयोगाने केली आहे. निवडणूक काळात कुठलेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून यात सर्व सहभागी शासकीय यंत्रणा, पथके बारकाईने लक्ष ठेऊन कारवाई करतात. रोकड, अवैध मद्यसाठा, अंमली पदार्थ वा शस्त्र अशी कुठलीही जप्तीची कारवाई केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ती माहिती त्वरित या ॲपमध्ये समाविष्ट करावी लागणार आहे. त्यामुळे या कारवाईची माहिती लगेचच निवडणूक आयोगाला मिळणार आहे. तथापि, या यंत्रणेचा आणखी सक्रिय वापर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, मनपाचे मुख्य लेखाधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने, आयटीचे संतोष निलेवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.