
नांदेड – सोशल माध्यमाद्वारे झालेल्या प्रेमाला प्राप्त करण्यासाठी पाकिस्तानातील एक सीमा नुकतीच भारतात पोहोचली होती. या प्रेमकहाणीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. अगदी त्याच प्रकारे नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील एका तरुणाच्या प्रेमात पडलेली सीमाही ( नाव बदलले आहे) राजस्थानमधील कोट्याहून नांदेडात पोहचली. मात्र नांदेडात पोहोचताच काही असामाजिक तत्वांनी त्यांना हेरले. मुलास मारहाणही केली. याप्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटकही केली आहे. पोलीसांच्या समुपदेशनानंतर सीमाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
सोशल मीडियाचा वाढता वापर हा सर्वांच्याच चिंतेची बाब बनली आहे. चांगल्या कामासाठी या माध्यमांचा वापर उपयुक्त ठरत असला तरीही तरुणाईने मात्र या सामाजिक माध्यमांना आपल्या मनातील भावना पुढच्याच्या मनापर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. याच सोशल माध्यमातील ‘इन्स्टाग्राम’ वरील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. अन् ती तरुणी थेट कोट्याहून मुंबई मार्गे नांदेडात पोहोचली.
नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील एका तरुणाची राजस्थानमधील कोटा येथील एका २३ वर्षीय तरुणीशी सहा महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. रोज प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जाऊ लागल्या. इन्स्टाच्या माध्यमातून दररोज बोलणे होत असल्याने दोघांनाही भेटीची ओढ लागली. या ओढीतूनच राजस्थानमधील कोटा येथून सीमा मुंबईला निघाली. तर तो तरुण भोकरहून मुंबईला पोहोचला. २६ मार्च रोजी त्यांची पहिली भेट मुंबईत झाली मुंबईतून ते २७ मार्चला नंदिग्राम एक्सप्रेसने नांदेडला पोहोचले. हे दोघे रेल्वेतून उतरले. नांदेड रेल्वे स्थानकावर ते दोघे थांबले होते. त्यावेळी काही तरुणांनी त्यांना घेरले, विचारपूस केली. अधिक माहिती मिळाल्यानंतर तरुणाला जबर मारहाणही केली. तर तरुणीला शहरातील शिवाजीनगर भागात नेण्यात आले. तर मारहाण करून त्या तरुणाला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सोडण्यात आले. त्याने वजीराबाद पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने पावले उचलत तरुणीला वजीराबाद ठाण्यात आणले आणि घटनेची माहिती घेतली.
सदर तरुणीचा जबाब घेतल्यानंतर शहरातील अनुसया महिला सुधारगृहात ३ दिवस ठेवण्यात आले होते. तिचे समुपदेशन केले. या काळात तरुणीच्या पालकांशी संपर्क करून त्यांना नांदेडमध्ये बोलावण्यात आले आणि तरुणीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
प्रेमासाठी पाकिस्तानातील सीमा देशाच्या सीमा ओलांडून भारतात आली. तर राज्याच्या सीमा ओलांडून राजस्थानमधील सिमाही नांदेडात पोहोचली. मात्र सामाजिक अडथळ्यामुळे ती आपल्या प्रेमाला प्राप्त करू शकली नाही.
याप्रकरणी कोट्याहून आलेल्या तरुणीचा वजीराबाद ठाण्यात पोलीस निरीक्षक पी. बी. कदम, रेल्वे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे, महिला दक्षता समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या महादेवी मठपती यांच्या उपस्थितीत जबाब घेण्यात आला. घटनेबाबत वजीराबाद पोलिसांनी रेल्वे पोलिसांना कळवले. यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. जवळपास दहा ते पंधरा जणांविरुद्ध रेल्वे पोलीस ठाण्यात भादंविच्या ३९५, ३६५, १४३, १४७, ५०६ आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना रेल्वे पोलिसांनी अटकही केली आहे.