दिनविशेष

अन् संपूर्ण लग्नसमारंभात झाला अभिजीतवर कौतुकाचा वर्षाव…

सर्वोच्च परीक्षेतील यशानंतरही जिल्हाधिकारी राऊत यांची आणि आईची दहा दिवसानंतर भेट..!

नांदेड – एका नातेवाईकाचा लग्न सोहळा सुरू असताना, सर्व कुटुंबीय, नातेवाईक एकत्र असताना एक बातमी येते… आपला मुलगा अधिकारी झाला… तो भारतातील सर्वोच्च परीक्षेत पास झाला… ही बातमी कळताच आईचा आनंद गगनात मावेनासा होतो… हा आनंद त्या आपल्या सर्व कुटुंबीयांना, नातेवाईकांना सांगतात. यावेळी आई आणि वडिलांसह सर्वांच्याच मनात एक अभिमानाची भावना निर्माण होते. आपल्या मुलाच्या अत्युच्च यशाचा हा आनंद व्यक्त करताना लग्न समारंभाला उपस्थित  प्रत्येक नातेवाईकाला आपल्या मुलाचे कौतुक सांगणाऱ्या या आई आहेत ललिता राजेंद्र राऊत… नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आई.

नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राजेंद्र राऊत हे कार्यरत आहेत. आज मातृदिन या मातृदिनानिमित्त जिल्हाधिकारी राऊत यांनी आपण अधिकारी झाल्याची बातमी कळल्यानंतर आईने व्यक्त केलेल्या भावना या शब्दात न सांगता येणाऱ्या असल्याचे सांगितले.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील एका सामान्य कुटुंबातील अभिजीत राऊत. वडील शिक्षक, आई गृहणी. एक भाऊ आणि एक बहीण असा छोटा परिवार. परिवारातील बहुतांश नातेवाईक हे शिक्षकी पेशातलेच. परंतु मनात काहीतरी करण्याची जिद्द असलेले अभिजीत राऊत यांनी बुलढाणा येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे गाठले. पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या अभ्यासाला, मेहनतीला फळही मिळाले. ३ मे २०१३ रोजी सर्वोच्च परीक्षेचा निकाल आला. त्यात राऊत यांना यश मिळाले. यशाची पहिली बातमी राऊत यांना पुण्यात असतानाच समजली. ही बातमी कळल्यावर राऊत यांना काही क्षण काय करावे आणि काय नाही हे कळलेच नाही. काही वेळानंतर आपण घेतलेल्या मेहनतीचा परिश्रमाचा कार्यकाळ त्यांच्या डोळ्यासमोरून सरकन येऊन गेला. त्यानंतर आपल्या यशाची बातमी त्यांनी आई ललिताबाई आणि वडील राजेंद्र राऊत यांना फोनद्वारेच कळवली. यावेळी सर्व कुटुंबीय, आई-वडील हे एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नसमारंभात होते. त्यावेळी अभिजीत यांच्या यशाची बातमी त्यांना कळाली. सर्व कुटुंबीय, नातेवाईक एकत्रित असतानाच हा आनंदाचा, अभिमानाचा क्षण त्यांच्या वाट्याला आला. मुलाचे कौतुक सांगताना त्या लग्न समारंभात शेवटपर्यंत थकल्या नाहीत. आता मुलाच्या भेटीचे वेध लागले होते. मुलगा पुण्याला होता. त्याला कधी एकदा डोळे भरून पाहील असेच झाले होते.

दुसरीकडे पुण्यामध्ये असताना अभिजीत राऊत हे अभ्यास करीत असताना एका संस्थेमध्ये खाजगी शिक्षक म्हणून कार्यरत होते. घरातील परिस्थिती बेताचीच असल्यामुळे आपला पुण्यातला शिक्षणाचा खर्च स्वतःच भागवावा या हेतूने त्यांनी खाजगी शिक्षक म्हणून काम सुरू केले होते. निकाल लागल्या नंतरही दहा दिवस त्यांना पुण्यातच थांबावे लागले. कारण त्या संस्थेचे निश्चित केलेले काही दिवस राहिले होते. त्यामुळे यूपीएससीसारख्या सर्वोच्च यशानंतरही त्यांनी आपले काम अर्धवट सोडले नाही. त्यांनी ते काम पूर्ण करूनच कुटुंबीयांची भेट घेतली. बुलढाण्यात कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सर्वांना अपार आनंद झाला. कौतुकाचे क्षण अनुभवाला आले. आईच्या प्रेमाने, कौतुकाने ते यावेळी अक्षरशः न्हाऊन निघाले.

अभिजीत राऊत यांनी सांगली येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. त्यानंतर दिल्ली येथे पहिली पोस्टिंग मानव संसाधन विभागात आणि आताच्या शिक्षण मंत्रालयात झाली. त्यानंतर नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून २०१५ ते २०१७ या कालावधीत ते कार्यरत होते. त्यानंतर  २०१७ ते २०२० या कालावधीत सांगली येथे  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. पुढे २०२० ते २०२२ या कालावधीत जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली. आता ते नांदेडचे जिल्हाधिकारी आहेत.

अभिजीत राऊत या मितभाषी, मातृहृदयी अधिकाऱ्याच्या मनात आई वडिलांविषयी सदैव कृतज्ञतेची भावना आहे. आईच्या संस्काराची शिदोरी आयुष्यात सोबत घेऊनच आपण वाटचाल करू,  अशीच भावना त्यांनी आज मातृदिनाच्या निमित्ताने व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!