महापालिका

ईसापूरचे पाणी पुन्हा एकदा भागवणार नांदेडकरांची तहान..! 

बुधवारी रात्री सोडलेले पाणी आसना बंधाऱ्यात पोहोचले

नांदेड – नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पावरील कोटीतीर्थ पंपहाऊस येथे निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात नांदेडकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. मात्र यावेळी नांदेडकरांसाठी ईसापूरचे पाणी धावून आले असेच म्हणावे लागेल. तीन दिवसात इसापूरचे पाणी नांदेडमध्ये पोहोचले आणि नांदेडचा पाणीप्रश्न काही अंशी मार्गी लागला. आता पुन्हा एकदा दोन दलघमी पाणी नांदेडसाठी इसापूरहून आसना बंधाऱ्यात पोहोचले आहे. या बंधाऱ्यातून उत्तर नांदेडला पाणीपुरवठा केला जात आहे.

विष्णुपुरी प्रकल्पात जलसाठा कमी झाल्यानंतर नांदेडला पाण्यासाठी पर्याय शोधावा लागत होता. इसापूरसह जायकवाडी, निम्न दुधना तसेच येलदरी धरणातून पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागत होती. ही समस्या सोडवण्यासाठी नांदेडमध्ये आसना नदीवर बंधारा आणि पंप हाऊस उभारून या ठिकाणी नांदेड महापालिकेने पर्यायी पाणीपुरवठा योजना तयार केली. या पाणीपुरवठा योजनेसाठी ईसापूर धरणातील ६ दलघमी पाणी राखीव ठेवण्यात येत आहे. मागील आठ वर्षापासून विष्णुपुरी प्रकल्पात दिग्रस बंधारा, नव्याने झालेला अंतेश्वर बंधारा येथून पाणी घेतले जात असल्याने ईसापूर प्रकल्प धरणातून पाणी घेण्याची वेळ आली नव्हती. जवळपास आठ वर्षे ईसापूर धरणातून पाणी घेण्यात आले नव्हते. मात्र एक मे रोजी निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडाने उत्तर नांदेडचा पाणीपुरवठा खंडित झाला. परिणामी ईसापूर धरणातील राखीव पाणी तातडीने देण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली. त्यांनी या मागणीला तात्काळ मंजुरी दिली आणि ईसापूर धरणातून पाणी सोडण्यात आल. त्यामुळे नांदेडची पाणीबाणी काहीअंशी शिथिल झाली होती.

आता पुन्हा एकदा नांदेडसाठी राखीव असलेले दोन दलघमी पाणी आसना बंधाऱ्यात घेण्यात आले आहे. बुधवारी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. ते पाणी गुरुवारी रात्री आसना बंधाऱ्यात पोहोचले आहे. ईसापूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी देण्यात येत असल्याने हे पाणी लवकर पोहोचले आहे. पहिल्या टप्प्यात आसना बंधाऱ्यात २.४१ दलघमी पाणी नांदेडकरांसाठी देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा दोन दलघमी पाणी घेण्यात आले आहे. हे पाणी पोहचलेही आहे.

जूनअखेर पर्यंतचा जलसाठा शिल्लक…विष्णुपुरी प्रकल्पात आजघडीला १८.१९ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. नांदेडला प्रतिमाह जवळपास चार दलघमी पाणी आवश्यक आहे. प्रतिदिन १२० दशलक्ष मीटर पाणी उचलले जाते आणि शहराला पाणीपुरवठा केला जातो. विष्णुपुरीतील शिल्लक जलसाठ्यातून नांदेडची तहान जूनअखेरपर्यंत भागणार आहे. पावसाळा लांबला तर पुन्हा पाण्यासाठी नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे. मात्र हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता जूनमध्येच मान्सूनचे आगमन होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान नांदेडकरांनी पाण्याची बचत करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप आरसुडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!