राजकीय

भाजपाचे माजी खासदार चिखलीकर यांच्या आजपासून आभार बैठका 

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचेही होणार चिंतन, घरभेद्यांचीही माहिती पुढे येणार

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघात पाच वर्ष खासदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठे पाठबळ दिल्याबद्दल  मतदारांचे आभार मानण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे आज ११ जूनपासून  सर्वच विधानसभा मतदारसंघात आभार बैठक घेणार आहेत. या आभार बैठकांमधून चिखलीकर यांच्या पराभवाची कारणमीमांसा होईल, घरभेदी नेमके कोणते होते, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न होईल. शेवटची बैठक ही चिखलीकर यांचा बालेकिल्ला असलेल्या लोहा आणि कंधार येथे होत आहे. त्यामुळे शेवटच्या बैठकीत चिखलीकर हे आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करतील असेही स्पष्ट संकेत मिळत आहेत.

आभार बैठकांचा कार्यक्रम देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातून सुरू होणार आहे. आज ११ जून रोजी सकाळी दहा वाजता बिलोली येथे आनंद गार्डन या ठिकाणी पहिली आभार बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता देगलूर येथे गोविंद माधवराव मंगल कार्यालय येथे बैठक पार पडेल. देगलूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार सभांमध्ये सक्रिय भूमिका पार पाडली नाही. तरीही देगलूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाला १ हजार १८० मते कमी मिळाली. देगलूर हा भाजपाचा गड मानला जात होता. हा गड कसा ढासळला, यासाठी कोणते शिलेदार फुटले याची चाचपणी आजच्या बैठकीत होईल अशी अपेक्षा आहे.

१२ जून रोजी सकाळी दहा वाजता मुदखेड येथे गवळी समाज मंदिर येथे आभार बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी एक वाजता भोकर येथे ओम लॉन्स येथे आभार बैठक पार पडेल. दुपारी चार वाजता अर्धापूर येथे माता जिजाऊ मंगल कार्यालयात आभार बैठक होईल. भोकर मतदारसंघातील या बैठकीतही बदललेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. भोकर विधानसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यातून चिखलीकरांना मताधिक्य मिळाले असले तरीही ते मताधिक्य केवळ ८४१ मतांचे आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमका दगा फटका कशामुळे झाला, ही बाब शोधण्यात येईल.

१३ जून रोजी माजी खासदार चिखलीकर हे सकाळी दहा वाजता उमरी येथे संत रोहिदास मंगल कार्यालयात मतदार आणि जनतेचे आभार मानतील. दुपारी एक वाजता धर्माबाद येथील श्रीराम बँक्वेट हॉल येथे आणि सायंकाळी साडेपाच वाजता नांदेड येथील हॉटेल ताज पाटील येथे जनतेशी संवाद साधणार आहेत. १४ जून रोजी दुपारी एक वाजता नायगाव येथील जयराज पॅलेस येथे बैठक होईल. मुखेड येथे दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. १३ आणि १४ जून रोजी होणाऱ्या बैठकामध्ये नायगाव, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर आणि मुखेड मतदार संघातील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. नायगाव, नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघात भाजपाची मोठी पडझड झाली आहे. नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मताधिक्यानेच काँग्रेसचा विजय साकारला आहे. त्यातच नायगाव विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार असतानाही काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना मिळालेली लीडही चिंतनाचा विषय ठरणार आहे. नायगाव मतदारसंघातून ४ हजार ३८२ मते चिखलीकरांना कमी मिळाली आहेत. मुखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले असले तरीही ते २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अतिशय कमी आहे. हे मताधिक्य ३ हजार ९९७ इतके आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातही भाजपाचाच आमदार आहे.

नांदेड उत्तर मतदारसंघात तब्बल ४० हजार ५९५ मतांची लीड मिळाली आहे. नांदेड दक्षिण मतदार संघाची लीड ही १८ हजार ९४ मतांची आहे. त्यामुळे शहरी भागात पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी सक्रिय नव्हते काय..? महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेची भूमिकाही नेमकी काय राहिली याचा शोधही अपेक्षित आहे. १३ जूनच्या बैठकीत या सर्व बाबी कोणत्या स्वरूपात समोर येतील, याकडेही लक्ष लागले आहे.

तर माजी खासदार चिखलीकर यांच्या आभार कार्यक्रमाचा समारोप १५ जून रोजी सकाळी दहा वाजता लोहा येथे आणि दुपारी एक वाजता कंधार येथे बैठक घेऊन करण्यात येणार आहे. या शेवटच्या बैठकीत खासदार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे आगामी काळातील राजकीय भूमिका स्पष्ट करतील अशी चिन्हे आहेत. शेवटची बैठक ही त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच लोहा – कंधार या ठिकाणी होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिखलीकर हे आपल्या बालेकिल्ल्यात परततील काय याची घोषणाही याच बैठकीत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, १० जून रोजी नांदेड शहरात शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक प्रदेश कार्यकारणी सदस्य अजय बिसेन यांनी घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांचा पराभव का झाला यावर चर्चा करण्यात आली. पक्षीय पातळीवरून आलेली रसद बूथ पातळीपर्यंत पोहोचली नाही, अशी भूमिका अनेकांनी या बैठकीत मांडली. त्याचवेळी मतदारांपर्यंत न पोहोचता केवळ चमकोगिरी करण्यातच पदाधिकारी राहिले आणि त्यातून चिखलीकर यांचा पराभव झाला अशी थेट भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी मांडली. जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्हच उपस्थित करण्यात आले आहेत. या बैठकीला पक्ष पातळीवर किती महत्त्व होते ही बाब बाजूला ठेवली तरी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या भूमिका मात्र आक्रमक होत्या. त्यामध्ये कार्यकारणीत त्वरित बदल करावा, ही मागणी ही प्रामुख्याने पुढे आली आहे. त्यामुळे आता पदाधिकाऱ्यांच्या या भावना वरिष्ठांपर्यंत कोण पोहोचवेल, यासाठी दूत म्हणून बजावली जाणारी भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. अनेक पदाधिकारी हे समाज माध्यमातूनही आपला रोष प्रकट करीत आहेत. त्याची दखलही पक्ष पातळीवर कशी घेतली जाईल याकडेच आता लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!