
नांदेड – राज्यात होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. हा विरोध लक्षात घेता खा. अशोकराव चव्हाण यांनी हा मार्ग हा महामार्ग रद्द करण्यासाठी आता पावले उचलली आहेत. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन माहिती घेतली. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत असलेल्या शक्तिपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीच्या सदस्यांशीही चर्चा करून हा महामार्ग थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे स्पष्ट केले.
नागपूर – गोवा दरम्यान होणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाला मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांतून विरोध होत आहे. मराठवाड्यातील अनेक शेतकरी या महामार्गामुळे बाधित होणार आहेत. या महामार्गामुळे जनतेच्या मनात आक्रोश आणि भीती उत्पन्न झाली आहे. मराठवाड्यातील बाधित शेतजमीन ही अनेक सिंचन कालवे, नद्या, विहिरी, तलाव अंतर्गत कायमस्वरूपी बागायती आहे, सुपीक आहे. अशा जमिनीवरून हा महामार्ग जात आहे. महामार्ग सोडून राहिलेली उर्वरित हजारो हेक्टर जमीन ही पाण्याअभावी नापीक किंवा दुष्काळी होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचा पारंपारिक शेती व्यवसाय आहे त्यांना किंवा त्यांच्या पाल्यांना बाहेरील जगाचे ज्ञान नाही ते इतर कोणत्याही व्यवसाय करू शकणार नाहीत. मावेजा नसल्याकारणाने ते इतर कोणत्याही व्यवसायात शिरू शकत नाही. मावेजा स्वरूपात मिळालेली रक्कम नुकसानीत जाणारी आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यावर दुहेरी नुकसान ओढवणार आहे. या महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमी होऊन भूमिहीन होऊन त्यांना स्थलांतरित व्हावं लागणार आहे. आजघडीला राज्यात नागपूर – रत्नागिरी हा समांतर महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची खरंच गरज आहे काय असा प्रश्नही शक्तीपीठ महामार्ग कृती समितीने उपस्थित केला आहे. या शेतकरी कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. या निदर्शने करणाऱ्या कृती समिती सदस्यांना खा. अशोकराव चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी भेट दिली.
तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी शक्तीपीठ महामार्ग व जिल्ह्यातील इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे रखडलेले प्रकल्प रस्त्यांना निधी मिळवणे याबाबतही चर्चा करण्यात आली. या सर्व प्रलंबित प्रश्नांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले. त्याचवेळी शक्तिपीठ महामार्ग थांबवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा केली असून सदर बाबतीत हे दोन्ही मंत्री सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या महामार्गाला येत्या काही काळात स्थगिती मिळण्याची शक्यता आहे, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. शक्तिपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीचे प्रमोद इंगोले, महेश कदम, मारोतराव सोमवारे, शिवाजी वानखेडे, शहानंद मुधळ, गजानन इंगोले, सुभाषराव इंगळे, शिवाजी वानखेडे आदींनी या प्रश्नाकडे खासदार चव्हाण यांचे लक्ष वेधले.
सकाळी अशोक चव्हाणांनी तर दुपारी वसंत चव्हाण यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट…लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच लोकप्रतिनिधी सक्रिय झाले आहेत. सोमवारी राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. तर आज मंगळवारी माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी राऊत यांच्याशी जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. हे प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचित केले. रस्ते, जलसंपदा, पिक विमा आदी विषयावर ही चर्चा झाली. त्यानंतर दुपारी नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला. मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाच्या कामाबाबतही त्यांनी माहिती घेतली. तीन दिवसापूर्वी हिंगोलीचे आमदार खा. नागेश पाटील आष्टीकर यांनीही राऊत यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली होती.