
नांदेड- नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा ५९ हजार मतांनी पराभव झाल्यानंतर आता या पराभवाचे मंथन केले जाणार आहे. या पराभवाच्या कारणांचा आढावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी नांदेडमध्ये होणार आहे. भाजपच्या विविध आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. त्याचवेळी पदाधिकाऱ्यांना या बैठकीचा अद्याप कोणताही संदेश महानगरातून प्राप्त झाला नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश घेतला. मराठवाड्यात भाजपाला मजबुती मिळावी यासाठी त्यांना थेट राज्यसभेवरही संधी देण्यात आली. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपा मजबूत होईल, अशी अपेक्षा बाळगण्यात आली होती. नांदेडसह शेजारील जिल्ह्यांतील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र निकालानंतर परिस्थिती विपरीत झाली. नांदेडचे भाजपाचे रनिंगचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना काँग्रेसचे उमेदवार वसंतराव पाटील चव्हाण यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मागचा पाच वर्षातील कार्यकाळ पाहता आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये केलेला प्रवेश, त्यासोबतच नांदेड जिल्ह्यातील त्यांच्या हजारो समर्थकांनी भाजप प्रवेशासाठी ठिकठिकाणी रांगा लावलेल्या… या रांगा इतक्या होत्या की पक्षात प्रवेशासाठी घालण्यात येणारे रुमालही कमी पडत असल्याचे वक्तव्य खासदार चव्हाण यांनी या प्रवेश सोहळ्यादरम्यान केले होते. अशा मजबूत परिस्थितीतही काँग्रेसने भाजपचे उमेदवार प्रतापराव यांचा केलेला हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. नांदेडसह हिंगोली, परभणी, लातूर बीड, उस्मानाबाद आणि जालनाचेही जागा महायुतीला गमवाव्या लागल्या आहेत.
त्यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील पराभवाचे मंथन करण्यासाठी भाजपाने निरीक्षक नेमले आहेत. हे निरीक्षक त्या त्या ठिकाणी झालेल्या पराभवाचे कारणे शोधणार आहेत. या कारणांचा अहवाल पक्षाला पाठविण्यात येणार आहे. पराभवाच्या कारणाबाबत भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. नांदेडच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. विखे पाटील हे शुक्रवारी रात्री नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी ते नांदेडमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहेत. भाजपाच्या या बैठकीचे निमंत्रण आतापर्यंत कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांना पोहोचले याबाबत अधिकृत माहिती नसली तरीही महानगराकडून संदेश प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघातील पराभवानंतर भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्यात मतदारांच्या आभार सभांचे आयोजन केले होते. या आभार सभांमध्ये त्यांनी प्रारंभी घेतलेली भूमिका मुंबईच्या बैठकीनंतर अचानक बदलली. माध्यमांशी संवाद साधत त्यांनी या पराभवासाठी वेगवेगळे घटक जबाबदार असल्याचे सांगितले. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदार संघाच्या आभार सभेत झालेला ‘राडा’ ही सर्वांच्याच लक्षात आहे. आता शनिवारी विखे पाटलांचा उपस्थितीत होणाऱ्या बैठकीचे नेमके स्वरूप कसे राहील, या बैठकीतील चर्चा कोणत्या स्वरूपात होईल याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पराभवाच्या कारणांचा हा अहवाल स्थानिक पातळीवर घोषित केला जाणार नाही, हे निश्चित असले तरीही प्रदेश पातळीवरून नांदेडच्या पराभवाचे कारण कधीतरी घोषित होईल का हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
खासदार अशोकराव चव्हाण मुंबईत…भाजप उमेदवाराच्या पराभवाची चर्चा करण्यासाठी शनिवारी नांदेडमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. या बैठकीस खासदार अशोकराव चव्हाण हे मात्र उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी शनिवारी आपण मुंबईत असल्याचे सांगितले आहे. नांदेडच्या पराभवाबाबत आपण पक्ष निरीक्षकांशी मुंबईत चर्चा करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.