
नांदेड – नांदेड येथून जवळपास पाच वर्षे बंद पडलेली विमानसेवा स्टार एअरने चालू वर्षात मार्चअखेर सुरू केली. आता बहुप्रतिक्षित असलेली नांदेड- पुणे विमान सेवा ही २७ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. पुण्यासह आता नागपूरलाही प्रवाशांना उडान करता येणार आहे.
प्रवाशांअभावी नांदेड- मुंबई आणि नांदेड – हैदराबाद ही विमानसेवा जवळपास पाच वर्षाहून अधिक कालावधीपासून बंद पडली होती. त्यामुळे नाईट लँडिंगची सुविधा असलेले नांदेडचे विमानतळ केवळ शोभेचेच आहे की काय अशीच चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर हे विमानसेवा सुरू करण्यासाठी राजकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले. अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ३१ मार्चपासून स्टार एअर कंपनीने नांदेडहून विमान सेवेला प्रारंभ केला. ३१ मार्चपासून नांदेड- बंगळुरू, नांदेड- दिल्ली – जालंधर ही सेवा दररोज तर नांदेड – हैदराबाद आणि नांदेड- अहमदाबाद ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू करण्यात आली आहे. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्टार एअरने आता नांदेड- पुणे आणि नांदेड – नागपूर ही विमानसेवा २७ जूनपासून सुरू झाली आहे.
नांदेड इथून आज गुरुवारी सकाळी १०.३० वाजता पुण्याला पहिल्या विमानाचे टेकऑफ झाले. नांदेडहून जवळपास ५५ प्रवासी या पहिल्या विमानात होते त्याचवेळी नांदेडहून नागपूरलाही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. नांदेडहून सकाळी १०:३० वाजता स्टार एअरचे विमान निघेल. पुणे येथे ते ११ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. पुण्याहून सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी नांदेडसाठी निघणारे विमान नांदेड येथे ११ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार आहे. नागपूरहून सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी नांदेडसाठी विमान सुटेल. हे विमान सकाळी १० वाजून ०५ मिनिटांनी नांदेड येथे पोहोचेल. तर नांदेडहून दुपारी १ वाजून १० मिनिटांनी नागपूरसाठी निघणारे विमान दुपारी दोन वाजता नागपूरला पोहोचेल.
पुणे आणि नागपूरसाठी नांदेडहून सुरू करण्यात आलेली ही सेवा सोमवार, मंगळवार आणि गुरुवार, शुक्रवार असे आठवड्यातील चार दिवस सुरू राहणार आहे.
- ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानीला बसणार काहीअंशी चाप…नांदेडहून पुण्यासाठी विमान सेवा सुरू व्हावी, अशी बहुतांश प्रवाशांची मागणी होती. पुण्याला जाणाऱ्या रेल्वे तसेच ट्रॅव्हल्सची मनमानी मोठ्या प्रमाणात सुरू होती. दिवाळी तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेमध्ये आरक्षण मिळत नव्हते तर ट्रॅव्हल्सकडून सीझनमध्ये दुप्पट तिप्पट भाडे आकारण्यात येत होते. आता विमानसेवेमुळे या मनमानीला काही प्रमाणात चाप बसणार आहे.