
नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णूपुरी येथे श्री गुरुगोबिंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा संपूर्ण भाग अचानक रस्त्यावर कोसळल्याच्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली आहे., या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेच्या तांत्रिक चौकशीसाठी केंद्रीय पातळीवरील तज्ज्ञांची टीम दिल्लीहून शनिवारी नांदेड येथे दाखल होणार आहे. चौकशीत बांधकामातील त्रुटी, निकृष्ट दर्जाचे साहित्य, कामातील निष्काळजीपणा अथवा संबंधित यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची हयगय झाल्याचे आढळल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. दुसरीकडे भूकंपामुळे हा पूल ढासळला असल्याचा दावा करणाऱ्या केटीआयएलकडून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत डागडुजीचे काम सुरू असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
घटनेनंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. उड्डाणपुलाची संरचनात्मक स्थिरता तपासून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले. या घटनेच्या तांत्रिक चौकशीसाठी केंद्रीय पातळीवरील तज्ज्ञांची टीम दिल्लीहून शनिवारी नांदेड येथे दाखल होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी उड्डाणपुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तात्काळ राबविण्यात आल्या. रस्त्यावर पडलेला मलबा जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आला तसेच पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही केली.पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले, सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांच्या जीविताशी संबंधित कामांमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदार अथवा संबंधित यंत्रणांविरुद्ध चौकशी अहवालानुसार नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उड्डाणपुलाच्या संपूर्ण बांधकामाची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. नांदेडमधील पूल दुर्घटनेचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केला. या घटनेत दोन मुली सुदैवाने वाचल्या तर दुसरीकडे कंत्राटदाराकडून भूकंपाचे कारण दिले जात आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी, घटनेला कोण जबाबदार आहे ते ठरवावे अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.



