प्रशासकीय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना रक्षाबंधनाला मिळणार लाभ – पालकमंत्री गिरीश महाजन

नांदेड जिल्ह्याच्या सन २०२४-२५ च्या ७४९ कोटींच्या आराखड्याला नियोजन समितीची एकमुखी मंजूरी

नांदेड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना आगामी रक्षाबंधन सणाला योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी दिली. योजनेसाठी निधी नाही अशी अफवा पसरवली जात आहेत, ती चुकीची आहे. योजनेसाठी कोणताही निधी कमी पडला जाणार नाही याची ग्वाही खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असल्याचेही ते म्हणाले. राज्य सरकारची, मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना रक्षाबंधनाला लाभ दिला जाईल असेही पालकमंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी सकाळी ११ वा. कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन येथे पार पडली. जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या तीनही योजना मिळून शासनाकडून मंजूर ७४९ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांना वेळेत पूर्ण करण्यासोबतच शिक्षण, आरोग्य, वीजपुरवठा, पाणीपुरवठा या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याचे निर्देश या बैठकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिले.

या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ.अजित गोपछडे, खासदार वसंतराव चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार विक्रम काळे, आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य विश्वांभर पवार, खान इसाखान सरदारखान, अरुणा कदम, माधवराव धर्माधिकारी, रामचंद्र पा. बन्नाळीकर, राजश्री भोसीकर, जीवन घोगरे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे तसेच विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

बैठकीच्या प्रारंभी ८ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुपालनास यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी गेल्या मार्च महिन्यात झालेल्या खर्चाला मान्यता देण्यात आली. गेल्या वर्षीच्या वार्षिक नियोजनात जिल्ह्यातील विविध विकास कामावर जिल्हा वार्षिक योजनेतून ६५९ कोटी खर्च झाले आहे. ९९.९९ टक्के निधी खर्च झाला आहे. २०२४-२५ या वर्षासाठी ७४९ कोटीची तरतूद मंजूर असून त्यापैकी शासनाकडून २२९ कोटी निधी प्राप्त झाला आहे.

या बैठकीत आतापर्यत जिल्ह्यात झालेले पावसाचे प्रमाण, धरणातील पाणीसाठा, जिल्ह्यातील रस्त्याच्या कामांची सद्यस्थिती, तसेच अर्धवट रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध करुन मिळण्याबाबत, हर घर जल योजनेत घराघरात पाणी पोहोचण्याबाबत सुरुवातीला चर्चा झाली. त्यानंतर बैठकीमध्ये लोकप्रतिनिधीनी काही प्रमुख समस्यांवर सभागृहात उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.यामध्ये पावडेवाडी येथील रस्ता व पाणीपुरवठा याबाबतचा प्रश्न, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याचा हप्ता न मिळणे, कृषि विभाग व विमा कंपनी यात समन्वयाची आवश्यकता, जिल्ह्यातील वीज वितरणास निधी वाढवून मिळणे, ग्रामपंचायतीना स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध करणे, गोवा – नागपूर शक्तीपीठ महामार्गाचे काम तुर्तास थांबविल्याची माहिती सर्वाना पोहोचविणे, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी भरती, औषधी व साहित्य खरेदी, शालेय शिक्षणात सूसूत्रता, पोषण आहारात सुधारणा, जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास, शाळेत स्वच्छतागृहाची बांधणी, माळेगाव यात्रेसाठी वाढीव निधी, वाघी येथील शाळेसाठी वाढीव निधी, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयास स्वच्छतेसाठी निधी, तसेच याठिकाणी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी निवाऱ्याकरीता धर्मशाळेची निर्मिती, सिटी स्कॅन, डायलिसिस मशीनची उपलब्धता, अन्नछत्रासाठी निधीची उपलब्धतता, तसेच शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपासाठी बँकांकडून अडवणूक होऊ नये याबाबत सर्व लोकप्रतिनिधीनी आपआपल्या विभागातील प्रश्न व समस्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडल्या. या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी यंत्रणाना सांगितले. तसेच जिल्ह्यातील काही भागातून अवैध धंदे, अंमली पदार्थाची वाहतुकीच्या तक्रारी आहेत. पोलिसांनी याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी सांगितले.

पथदर्शी योजनांकडे लक्ष वेधा…शासनाने प्रत्येक घटकासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची दक्षता घ्यावी. तसेच राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना रक्षाबंधनाला महिला भगिनींना द्यायचा आहे, त्यामुळे या योजनेपासून जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित राहणार नाही यांची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री महाजन यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कार्यारंभ आदेश द्यावेत…जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्याची कार्यवाही यंत्रणानी करावी. निवडणूक आचारसंहितेपूर्वी विकास कामे मार्गी लागतील यांची दक्षताही घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यात बांबू लागवडीला प्राधान्य देण्यात येवून बांबू लागवडीचा प्रसार करावा, तसेच जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मितीवरही भर द्यावा, शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सूत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!