राजकीय

नकली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचा काय विकास करणार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नरसीत सवाल 

नांदेड – देशात होत असलेली लोकसभेची निवडणूक ही नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी होत आहे. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात देश समृद्ध झाला आहे. आगामी काळात तो विकसित होऊन देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्रातील नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी काँग्रेस महाराष्ट्राचा काय विकास करेल असा सवाल भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे केला.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नायगाव तालुक्यातील नरसी येथे गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन, खा. डॉ. अजित गोपछडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अमित शहा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर टीका करताना ही महाविकास आघाडी महाराष्ट्राचे काय भले करेल असा प्रश्न उपस्थित केला. तीन चाकाची ही आघाडी ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी असल्याचेही ते म्हणाले. देशात मोदीच्या नेतृत्वाखाली देशभक्तांची टोळी एकत्र आहे. तर काँग्रेस आघाडीला आगामी काळात भविष्य नसून अंतर्गत मतभेदातच ही आघाडी तुटणार आहे. कश्मीरमधील ३७० कलम हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला तर काँग्रेसने मात्र ७० वर्षे हा प्रश्न प्रलंबित ठेवला होता. काँग्रेसच्या कार्यकाळात पाकिस्तानमधून अनेकवेळा भारतावर हल्ले व्हायचे. मोदी सरकारच्या काळात हल्ला झाल्यानंतर दहा दिवसातच सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून आतंकवाद्यांचा सफाया केला. महाराष्ट्र, बिहार, झारखंड, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यातून नक्षलवाद उखडून फेकण्याचे कामही करण्यात आले आहे. देशाच्या भावनेचा प्रश्न असलेल्या राम मंदिराचे निर्माणही करण्यात आले आहे. ५०० वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. आगामी रामनवमी ही १७ एप्रिल रोजी होणार आहे. भगवान रामलल्ला आपला वाढदिवस आता टेंटमध्ये नाही तर मोठ्या उत्सवात साजरा करतील अशी टिप्पणी ही त्यांनी केली. काँग्रेसने हा प्रश्न प्रलंबित ठेवलाच पण अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही ते सहभागी झाले नाहीत. आगामी काळात सोमनाथ मंदिर सोन्याचे करण्याची तयारी केली जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना अमित शहा म्हणाले, सोनिया सरकारच्या कार्यकाळात दहा शरद पवार केंद्रात होते. महाराष्ट्राला १ लाख ९१ हजार कोटी रुपये दिले होते. तर मोदी सरकारच्या दहा वर्षात महाराष्ट्राला ७ लाख १५ हजार कोटी प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३ लाख ९० हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी, ७५ हजार कोटी राष्ट्रीय महामार्गासाठी, २ लाख १० हजार कोटी रेल्वेसाठी, १ लाख कोटी विशेष पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्राला देण्यात आले आहेत.

काँग्रेस आघाडी महाराष्ट्राचा विकास करू शकणार नाही. महाराष्ट्राचा विकास हे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच करतील असेही शहा म्हणाले. नांदेडमध्ये ३०० किलो मीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. बंद पडलेली विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. ८६ हजार कोटींचा नागपूर – गोवा हा शक्तिपीठ महामार्ग ही पूर्ण करण्यात आला आहे. त्यामुळे विकासाची ही गंगा यापुढे सुरूच राहील असेही ते म्हणाले. भाजपाने औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले तर उस्मानाबादचे नाव धाराशिव केले आहे. हा निर्णय झाल्यानंतरही शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे नाराज असल्याचेच ते म्हणाले. २०४७ मध्ये विकसित आणि मजबूत भारत हाच नारा आता भाजपाचा असून देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींना पंतप्रधानपदी पुन्हा एकदा विराजमान करणे आवश्यक आहे. त्यासाठी नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना दिलेले मत हे थेट मोदींना मिळणार आहे. नांदेडमधून प्रचंड मताने चिखलीकर यांना विजयी करण्याचे आवाहनही अमित शहा यांनी केले

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात सर्वांना विकासाच्या गाडीत स्थान भाजप देऊ शकते असे ते म्हणाले तर काँग्रेस आघाडी ही विकासाची गाडी नसून केवळ इंजिनच आहे सर्वांनाच वाटते आपण इंजिन आहोत डबे या गाडीला नसल्याचे नसल्याची टीका त्यांनी केली हे इंजिनही वेगवेगळ्या दिशेने जात असल्याने देशाचे प्रश्न कसे सोडवू शकतील असा सवाल फडणवीस यांनी केला. देशाला विकासासाठी मोदीच हवे असल्याचे ते म्हणाले. चिखलीकर यांना दिलेले मत हे थेट मोदींनाच मिळणार आहे. नांदेडमध्ये विरोधी उमेदवाराला भाजपाच्या राजेश पवारांनी ५५ हजारांनी पराभूत केले होते. त्यामुळे हा उमेदवार किती टिकाव धरू शकेल असे ते म्हणाले.

अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेसची काय अवस्था झाली यावर बोलताना काँग्रेस आज ‘न घर का न घाटका झाल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी सांगलीतला तर शरद पवारांनी भिवंडीतला उमेदवार घोषित केला हे काँग्रेसला माहितीच नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून गेला आता काँग्रेसला शून्यावर आणायचे आहे. नांदेडकर आणि हे करून दाखवावे असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, खा. डॉ. अजित गोपछडे, आ डॉ. तुषार राठोड यांचीही समायोजित भाषणे झाली. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. माधवराव किन्हाळकर, संजय कौडगे, संतुकराव हंबर्डे, विजय सोनवणे, आ. भीमराव केराम, प्रणिता चिखलीकर, पुनम पवार, देविदास राठोड, प्रवीण चिखलीकर यांची उपस्थिती होती सभेचे सूत्रसंचालन प्रवीण साले यांनी केले.

कमळ चिखलातच फुलते…
नांदेडमध्ये कमळ फुलणार आहे. कारण नांदेडचे उमेदवार चिखलीकर आहेत. त्यामुळे चिखलातच कमळ फुलते हा निसर्गाचा नियम आहे. चिखलीकर हे प्रचंड मताने निवडणूक जिंकतील हा विश्वास येथील जनसमुदाय पाहून आपल्याला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!