
नांदेड – जिल्ह्यात प्रदीर्घ काळ दडी मारलेल्या पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. मान्सूनच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला आणि त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बळीराजा चिंतीत झाला होता. अखेर बळीराजाची ही चिंता १५ आणि १६ जुलै रोजी झालेल्या पावसाने दूर झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ३७.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल १४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये बिलोली तालुक्यातील चार महसूल मंडळाचा समावेश आहे. किनवट तालुक्यातील जलधारा मंडळात तर २४ तासात १६० मिनिट पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मान्सूनच्या प्रारंभी झालेल्या पावसात आणि त्यानंतर कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसाने खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. त्यानंतर दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला होती. मात्र म्हणावा तसा पाऊस होत नव्हता. पिके पिवळी पडत असल्याने आणि सुकत असल्याने शेतकरी चिंतेत होता. सोमवारी दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस दिवसभर सुरू होता. रात्रीही अनेक भागात पाऊस सुरूच होता. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७.१० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सोमवारी सहा तालुक्यातील १४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामध्ये बिलोली तालुक्यात बिलोली मंडळात ७९.७५ मिमी, सगरोळी मंडळात ६७.७५, आदमपूर १०३.२५ आणि रामतीर्थ मंडळात १०० मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला. कंधार तालुक्यातील फुलवळ येथे १३७.२५ मिमी, पेठवडज ७१.२५ आणि बारूळ मंडळात ७१.२५ मिलिमीटर पाऊस झाला. लोहा तालुक्यातील माळाकोळी मंडळात ८६.५०, किनवट तालुक्यातील जलधारा महसूल मंडळात सर्वाधिक १६० मिलिमीटर आणि सिंदगी मंडळात ६७.७६ मिमी, धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद मंडळात ६९.५९ मिमी, जारिकोट ७८.५० आणि सिरजखेड मंडळात ११८.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. उमरी तालुक्यातील धानोरा महसूल मंडळात ७६.७५ मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार नांदेड तालुक्यात २८.७० मिलिमीटर पाऊस, बिलोली तालुक्यात ७७.३०, मुखेड तालुक्यात १३.६०, कंधार ५१.३०, लोहा ३८.९०, हदगाव २०.४०, भोकर १८.७०, देगलूर १७.८०, किनवट ५१.६०, मुदखेड ४०, हिमायतनगर २४.७०, माहूर २२.२०, धर्माबाद ८१.१०, उमरी ३३.९०, अर्धापूर ३७ मिमी आणि नायगाव तालुक्यात ४४.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७५.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरीच्या ३०.७८ टक्के पाऊस आजपर्यंत झाला आहे.
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शेत शिवार चिंब…जिल्ह्यात या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस आहे. १५ आणि १६ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला होता. मंगळवारीही सायंकाळी पाच वाजेनंतर जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पेरणीनंतर पिके उगवली खरी मात्र मोठ्या पावसाची गरज होती. ती गरज सोमवार आणि मंगळवारच्या पावसाने भागली आहे. जिल्ह्यात आठ लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. पावसाअभावी अनेक भागात पिके पिवळे पडली होती. काही भागात पिके सुकू लागली होती त्यामुळे मोठ्या पावसासाठी प्रतीक्षा प्रार्थना केली जात होती अखेर बळीराजाची ही प्रार्थना पांडुरंगाने ऐकली आहे. आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला शेतशिवार आता चिंब झाले आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या आनंदात असून आषाढी एकादशीच्या भक्ती भावात तो चांगलाच रमला आहे.