
नांदेड – जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर नांदेड जिल्ह्यात दोन उपविभागीय अधिकारी येणार आहेत. जिल्ह्यातील तीन तहसीलदारही परजिल्ह्यात जाणार असून आता हिमायतनगर येथे नवे तहसीलदार नियुक्त करण्यात आले आहेत. या बदली आदेशानुसार नांदेड उपविभागीय अधिकारी म्हणून डॉ. सचिन खल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. खल्लाळ यांनी यापूर्वी नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, कंधार येथे उपविभागीय अधिकारी आणि नांदेड येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार राज्य शासनाने प्रशासकीय कारणास्तव या बदल्या केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील बहुचर्चित उपविभागीय अधिकारी सचिन गिरी हे आता मुंबई येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सक्षम प्राधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. गिरी यांच्या कार्यकाळात उपविभागात वाळूमाफीयांची मोठ्या प्रमाणात चलती होती. त्यावर कोणताही अंकुश लावण्यासाठी गिरी हे पुढे आलेच नाहीत. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते अगदी मंत्रालयापर्यंत करण्यात आल्या होत्या. नांदेड येथील उपविभागीय अधिकारी विकास माने यांनाही आपल्या प्रशासकीय कार्यकाळात नांदेडमध्ये काम करताना कोणतीही छाप पाडता आली नाही. त्यांची बदली आता हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे उपविभागीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी वसमत येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. सचिन खल्लाळ हे नांदेड उपविभागीय अधिकारी म्हणून सोमवारी रूजू होणार आहेत. डॉ. खल्लाळ यांना नांदेड जिल्ह्यात काम करण्याचा मोठा अनुभव आहे. नांदेड येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मात्र तत्कालीन सत्ता बदलानंतर त्यांना राजकीय हस्तक्षेपाचा फटका बसला होता. त्यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच नांदेडहून बदली झाली होती. आता पुन्हा एकदा ते नांदेडमध्ये येत आहेत. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष भूसंपादन अधिकारी अनुप पाटील यांची रिक्त असलेल्या देगलूरच्या उपविभागीय अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. सीमावर्ती भागातील बिलोली उपविभागीय अधिकारीपदी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे या काम पाहणार आहेत. शनिवारी छत्रपती संभाजीनगर विभागातील १२ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
शनिवारीच छत्रपती संभाजीनगर विभागातील पंधरा तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेशही काढण्यात आले आहेत. त्यामध्ये बिलोलीचे बहुचर्चित आणि सर्वाधिक तक्रारी असलेले तहसीलदार श्रीकांत निळे यांची बीड येथे बदली करण्यात आली आहे. देगलूर येथील तहसीलदार राजाभाऊ कदम आता लातूर जिल्ह्यातील जळकोटचा कारभार पाहणार आहेत. राजाभाऊंनी देगलूर येथे काम पाहताना कोणत्याही कारवाईपासून पळ काढल्याचेच दिसून आले. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार रघुनाथ कोलगणे यांची लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. या बदली आदेशानुसार लातूर जिल्ह्यातील देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे हिमायतनगर येथे तहसीलदार म्हणून येणार आहेत.
महसूल पंधरवडा झाला आता बदली पंधरवडा..! महसूल विभागाच्या वतीने १ ते १५ ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार विविध उपक्रम राबविण्याचे निर्देशही दिले आहेत. परंतु १ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या सर्वसाधारण बदल्या करता आल्या नाहीत. त्या सर्वसाधारण बदल्या आता १५ ऑगस्टपर्यंत कराव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देशही सर्व विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाने एक ऑगस्टच्या पत्रानुसार दिले आहेत. त्यामुळे आता महसूल विभागाच्या महसूल पंधरवड्यात आता बदलीच्या हालचालींना गती येणार आहे. त्यामुळे यावर्षी महसूल पंधरवडा आता बदली पंधरवडा म्हणूनही ओळखला जाईल.