प्रशासकीय

‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात सोमवारपासून शिबिरांचे आयोजन

३१ ऑगस्ट नोंदणीची अंतिम तारीख - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये. या योजनेसाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. मात्र जिल्ह्यातील पात्र महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी ८ जुलैपासून शिबीरांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

यासंदर्भात जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे. या योजनेला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य भगिनींचा  प्रतिसाद मिळून येत आहे. या योजनेविषयी उत्साह दिसून येतो. योजनेमध्ये अनेक महत्वाचे बदल ३ जुलै रोजी शासन निर्णयाद्वारे करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे या योजनेमधील जे लाभार्थी आहेत, अशा २१ ते ६५ वयोगटातील सर्व विवाहित महिला, घटस्फोटित, परित्यक्ता, किंवा निराधार महिला तसेच प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिला यांना या योजनेमध्ये लाभ घेता येईल.

त्याचबरोबर ज्या कुटूंबामध्ये ५ एकर पेक्षा जास्त जमीन आहे,त्यांनाही या योजनेत सहभाग घेता येणार आहे. बाह्ययंत्रणा, किंवा स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी कुटुंबाचे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब आहेत, त्यामधील महिला देखील पात्र ठरतील. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेमध्ये १ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते अशा महिलांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही, त्यामुळे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

या योजनेसाठी अर्ज करतांना कोणीही धावपळ करू नये. सुधारीत शासन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी व सुलभ झाली आहे. उत्पन्नाचा दाखल्याबाबत आता आपल्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. रहिवासी पुराव्यासाठी १५ वर्षापूर्वीचे जुने रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असेल तर रहिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही. इतर राज्यातील विवाह करून आलेल्या महिलांसाठी त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

आता या योजनेसाठी दोन महिने म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक गावात ८ जुलैपासून या योजनेचे अर्ज करण्यासाठी शिबीर आयोजित केले जाणार आहे. या शिबिरात महिलांना अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी कोणीही एजंट मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींच्या अमिषाला बळी पडू नये. या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. आपण स्वत: किंवा आपल्या घरातील एखादा तरुण सदस्यामार्फत अर्ज भरू शकता. छायाचित्र काढून ई-केवायसी करून इतर माहिती भरू शकता. शासनामार्फत आयोजित शिबिरातही याबाबत मदत केली जाणार.

कोणत्याही अमिषाला बळी पडू नका…नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र महिला भगिनींना या योजनेमध्ये लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत: दक्ष आहे. प्रशासनाची सर्व टीम आपल्या सोबत आहे. कुठल्याही प्रकारची धावपळ न करता, घाईगडबड न करता, अमिषाला बळी न पडता या योजनेसाठी अर्ज करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!