हवामान

जिल्ह्यात आज काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता 

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

नांदेड – उन्हाचा कडाका वाढल्याने प्रादेशिक हवामान विभागाकडून जिल्ह्यात १ मे रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

या अनुषंगाने नागरिकांनी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. या उपाययोजनांमध्ये उष्णतेच्या लाटेदरम्यान लहान मुलं व वृद्ध यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेताना या काळात सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत,

हलका आहार घ्यावा, फळे आणि सलाद सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे, पुरेसे पाणी प्या, उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, छत्री, टोपी, बूट, चप्पल घालूनच घराबाहेर पडावे. प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी. शक्य असल्यास थंड पाण्याने आंघोळ करावी. घराबाहेरील उपक्रम, मैदानी उपक्रमादरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारता वाढवावी.

उष्माघाताची लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी. या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत.

उष्माघाताची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवा, व्यक्तीचे कपडे सैल करा. त्याला द्रव पदार्थ जसे पाणी, ओ.आर.एस., फळांचा रस यापैकी एक पाजा. चहा किंवा कॉफी देण्याचे टाळा. तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवा. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा आणि वैद्यकीय सल्ला घ्या. अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा. नागरिकांनी वरील काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!