प्रशासकीय

निचपूर ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामांच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेपुढे तीन दिवसांपासून उपोषण सुरू 

किनवट पंचायत समितीपुढेही केले होते उपोषण, चौकशी समिती केली होती गठित, अहवाल मात्र अद्याप अप्राप्त

नांदेड – किनवट तालुक्यातील निचपूर ग्रामपंचायती अंतर्गत पंधरावा वित्त आयोग, तांडावस्ती, दलित वस्ती सुधार योजना, पेसा या विविध योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी निचपूर येथील उपसरपंच तसेच इतर २ ग्राम पंचायत सदस्यांनी केली आहे. या उपोषणाकडे तीन दिवसानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्षच केल्याची बाब पुढे आली आहे. याच मागणीसाठी किनवट पंचायत समिती कार्यालयापुढेही जुलैमध्ये उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी गठित करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवालही अद्याप अप्राप्तच असल्याने या कामांमध्ये मोठे गौडबंगाल असल्याचे स्पष्ट होत आहे.

निचपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच बालाजी डोईफोडे, ग्रामपंचायत सदस्य शंकर अंकुरवार आणि आडेलू डेबू घोगेवाड यांनी नांदेड जिल्हा परिषद कार्यालयापुढे २० ऑगस्ट २०२४ पासून उपोषण सुरू केले आहे. निचपूर येथे झालेल्या विविध कामांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि किनवटच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संगणमताने गावामध्ये विकास कामे न करता निधीचा अपहार केल्याची तक्रार या उपोषणकर्त्यांनी केली आहे. याबाबत किनवट पंचायत समितीकडे वारंवार तक्रार करण्यात आली तसेच ९ जुलै २०२४ पासून उपोषणही करण्यात आले होते. या उपोषणाअंतर्गत विविध योजनेच्या बँक खात्याचे स्टेटमेंट आणि मोजमाप पुस्तिका मिळाव्यात, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली होती. कामांची चौकशी करावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले होते. त्यावेळी उपोषणकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर याबाबत एक चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या चौकशी समितीचे प्रमुख हे गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव आहेत. सदस्य म्हणून शाखा अभियंता पी.एस. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता अमित गोविंदवाड, सहाय्यक लेखाधिकारी सुनील नेमानीवार, विस्तार अधिकारी वसंता वाघमारे, निवृत्ती मुकनार आणि पेसाचे जिल्हा व्यवस्थापक आरिफ शेख यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या चौकशी समितीने २० दिवसात अहवाल सादर करावा, असे आदेश चौकशी समितीचे अध्यक्ष असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनीच दिले होते.

विशेष म्हणजे तक्रारदार त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांबाबतही तक्रार केली असता त्यांच्याच अधिपत्याखालील समितीने या प्रकरणाची चौकशी केली आहे. ज्याचा अहवाल अद्याप अप्राप्तच आहे. त्यामुळे ज्यांच्या विरुद्ध तक्रार तेच चौकशीचे प्रमुख असा प्रकार या प्रकरणात घडला आहे. सदर समितीने १४ ऑगस्टपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करावा असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अद्यापही हा अहवाल उपोषणकर्ते अथवा नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे अद्याप सोपविला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा उपोषण करावे लागले असल्याचे उपसरपंच डोईफोडे यांनी सांगितले.

९ जुलै २०२४ रोजी उपसरपंच बालाजी डोईफोडे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले होते. यामध्ये गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकाने संगणमताने निचपूर येथील ग्रामपंचायतीच्या नावाने आलेला धनादेश उचलून घेतला आहे. तसेच इतर चेक तिसऱ्या व्यक्तींच्या नावे देऊन लाखों रुपयांची उचल केल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व उचललेल्या रकमेचे बँक स्टेटमेंट नावासहित जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही डोईफोडे यांनी केली आहे.

सोमवारी सुनावणी होणार…निचपूर प्रकरणात जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनकर दहिफळे यांनीही बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची भेट घेतली. या कामांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल यांनी सदर प्रकरणाची सुनावणी सोमवारी दि. २६ ऑगस्ट रोजी घेतली जाणार असल्याचे सांगितले. तर पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी किनवट गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात पुढील चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!