प्रशासकीय

नांदेड पोलिसांनी पकडलेले ‘ते’ धान्य आमचे नव्हेच..!

महिला, बालविकास विभागाचा खुलासा, घरपोच आहार मिळाला नसल्याबाबत एकाही लाभार्थ्यांची किंवा पालकांची तक्रार नाही...

नांदेड – कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत कुंटूर फाटा येथे एका गोदामात नांदेड पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लश आउट’ अंतर्गत पकडलेले ‘ते’ धान्य आमचे नव्हेच… असा खुलासा नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला, बालविकास विभागाने केला आहे. त्यामुळे पोलिसांनी पकडलेले धान्य नेमके कोणाचे आहे? हा प्रश्न आता समोर आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या या खुलाशाने या प्रकरणाची क्लिष्टता आता आणखी वाढली आहे.

नांदेड पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लश आउट’ अंतर्गत ३१ ऑगस्ट रोजी कुंटूर फाटा येथील रजवी नवाज हुसेन अब्दुल बारी याच्या गोदामावर छापा मारून अंगणवाडी केंद्रामार्फत घरपोच दिला जाणारा आहार जप्त केला आहे. हे धान्य महिला बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रावर गरोदर माता आणि लहान मुलांना वाटप करण्यात येणाऱ्या घरपोच आहाराचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते.

याबाबत महिला बाल विकास विभागाने खुलासा देताना म्हटले आहे की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालक, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना घरपोच आहार देण्यात येतो. ज्यामध्ये एनर्जी डेन्स तूर डाळ खिचडी प्रीमिक्स, एनर्जी डेन्स मुगडाळ खिचडी प्रीमिक्स, मल्टीमिक्स सिरीयल अँड प्रोटीन्स प्रीमिक्स या पाककृतींचा समावेश आहे. हा आहार प्रिमिक्स पद्धतीने सीलबंद पाकिटातून लाभार्थ्यांना घरपोच देण्यात येतो. या आहारात तेल, मीठ, मिरची, हळद तसेच इतर अन्नघटक मिसळलेले असतात. त्यामुळे सदर हा आहार हवाबंद डब्यातूनच साठवून ठेवावा लागतो. हा आहार पुरवठा करण्यासाठी संबंधित पुरवठादारास लाभार्थी संख्येनुसार आहाराची मागणी करण्यात येते. प्रती लाभार्थी दोन पाकिटे याप्रमाणे आहाराचा पुरवठा अंगणवाडी केंद्रावर झाल्यानंतरच अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या आहाराचेच देयक संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांकडे सादर करण्यात येते. घरपोच आहाराचा पुरवठा अंगणवाडी केंद्रावर झाल्यानंतर सदर आहार प्राप्त झाल्याची नोंद अंगणवाडी केंद्रातील साठा नोंदवहीत घेण्यात येते. त्यानंतर त्याचे वाटप लाभार्थ्यांना केले जाते आहार वाटप करताना संबंधित लाभार्थी, पालक यांची पोहोच घेण्यात येते. हा आहार लाभार्थ्यांना ५० दिवसाकरीता देण्यात येतो.नांदेड जिल्ह्यातील नायगाव अथवा कोणत्याही प्रकल्पातून घरपोच आहार मिळाला नसल्याबाबत एकाही लाभार्थ्यांची किंवा पालकांची तक्रार जिल्हा अथवा प्रकल्प कार्यालयात प्राप्त झालेली नाही. सद्यस्थितीत सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ या दोन महिन्याच्या कालावधीसाठीचा आहार पुरवठा केला जात आहे. अंगणवाडी केंद्रांना घरपोच आहाराचा पुरवठा करण्यात येत असलेल्या आहारात तूर, सोयाबीन, चना, अरकळ, तांदूळ व गहू यांचा समावेश नसल्याचेही महिला बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

तो आहार लाभार्थ्यांनीच विकला असावा..! – राहुल शिवशेट्टे…  कुंटूर फाटा येथील गोदामात पोलिसांनी तूरडाळ खिचडी प्रीमिक्सच्या २५ बॅग, मुगडाळ खिचडी प्रीमिक्सच्या २० बॅग, मल्टीमिक्स प्रोटीन प्रीमिक्सच्या ७० बॅग आणि बालकासाठी मल्टीमिक्स प्रोटीन प्रीमिक्सच्या ७० बॅग सापडल्या आहेत. या बॅग महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रावर गरोदर माता, लहान मुले तसेच किशोरी मुलींना मोफत वाटप करण्यात येतात. मात्र त्या बॅग गोदामात सापडल्याबाबत नायगावचे बालविकास प्रकल्पाधिकारी राहुल शिवशेट्टे यांनी सदर लाभार्थ्यांनीच विकल्या असाव्यात, असा खुलासा सादर करीत हात वर केले आहेत. असे असले तरी संबंधित गोदामधारकाकडे शासनाकडून वाटप करण्यात आलेले धान्य असणे हे बेकायदेशीर आहे. त्यानुसार संबंधित गोदामधारकाची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. दुसरीकडे सापडलेल्या बॅगबाबत जिल्हा महिला, बालविकास विभागाने मौन बाळगले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!