महापालिका

नांदेड शहरातील अनेक सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले, शहरातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता 

महापालिकेने १५ निवारा केंद्र केले स्थापन, नागरिकांना निवारा केंद्रात हलवण्यास प्रारंभ

नांदेड: नांदेड शहरातील अनेक सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने शहरवासीयांची तारांबळ उडाली आहे. दुसरीकडे विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे हा विसर्ग सोमवारी रात्रीपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सकल भागातील नागरिकांची रात्र आता धोक्याची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये १५ निवारा केंद्र महापालिकेने स्थापन केले आहेत. या निवारा केंद्रावर पूर प्रभावित नागरिकांना हलविण्यात येत आहे.

नांदेड शहर व जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाने शहरातील अनेक सखल भागातील घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. परिणामी या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका शहरातील गोकुळनगर, हमालपुरा, अमन कॉलनी, बालाजी नगर, बी.के. हॉल परिसर, यशवंत कॉलेज परिसर, वसरणी, श्रावस्ती नगर, तेहरा नगर नवीन श्रावस्ती नगर, पप्पड गल्ली, खडकपुरा, जुना नांदेडात करबला, गौतमनगर, काला पूल, लक्ष्मीनगर, शिवनगर, बालाजी नगर, दत्तनगर, खोब्रागडे नगर, बाबा नगर, नंदिग्राम सोसायटी, तानाजीनगर आदी भागांना बसला आहे. तर शहरातील इतरही अनेक नगरामध्येही पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत.पहिल्या एक दोन दिवसात महापालिकेची कोणतीही यंत्रणा येथे पोहोचली नसल्याची तक्रार अनेक भागातील नागरिकांनी केली आहे.

शहरात रविवारी दुसऱ्या दिवशी महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग, सर्व क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक हे पूर प्रभावित भागामध्ये पोहोचले. मात्र आवश्यक ती साधनसामग्री नसल्यामुळे केवळ नागरिकांना सूचना करण्यात आल्या. मात्र तिसऱ्या दिवशीही पाऊस सुरूच असल्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेने या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील विविध भागांमध्ये तात्काळ १५ निवारा केंद्र स्थापन केले. त्यामध्ये तरोडा सांगवी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आर. के. फंक्शन हॉल लक्ष्मीनगर येथे, अशोकनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पाटीदार मंगल कार्यालय पटेल कॉलनी, राजश्री शाहू महाराज हायस्कूल वसंतनगर, शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यांतर्गत नरसिंह विद्यामंदिर पारस नगर, क्षेत्रिय कार्यालय क्रमांक चार वजीराबाद अंतर्गत गांधी राष्ट्रीय विद्यालय गाडीपुरा, नवनिहाल स्कूल दुल्हेशहा रहमाननगर खडकपुरा, नेहरू इंग्लिश स्कूल सोमेश कॉलनी, एनटीसी मिल कलामंदिर मागे, खैर उल्लूम हायस्कूल खडकपुरा तसेच इतवारा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लिबर्टी फंक्शन हॉल करबला, प्रतिभा निकेतन हायस्कूल व प्रतिभा निकेतन नाट्यमंदिर होळी, अनवर गार्डन माळटेकडी रोड, हैदर गार्डन माळटेकडी रोड आणि सिडको क्षेत्रिय कार्यांतर्गत जिल्हा परिषद शाळा वसरणी येथे पूर प्रभावित नागरिकांसाठी निवारा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

नांदेड महापालिकेने स्थापन केलेल्या जुन्या नांदेडातील किल्ला येथे बारा कुटुंबांना हलवण्यात आले असून येथे ६० नागरिक निवारा केंद्रात आहेत. गाडीपुरा भागातील गांधी राष्ट्रीय विद्यालयात १५ लोकांना हलवण्यात आले आहे. शहरातील लिबर्टी फंक्शन हॉल येथेही १२ लोक हलविण्यात आले आहे. निवारा केंद्रात हलवण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या रात्रीपर्यंत वाढेल, अशी माहिती उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी दिली.

नांदेडमध्ये आता दूषित पाण्याचाही प्रश्न..!        गोदावरी नदीला आलेला मोठा पूर लक्षात घेता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी येथील काळेश्वर पंप हाऊस आणि विष्णुपुरी पंप हाऊस पुराच्या पाण्यात आहेत. कच्चा पाणीपुरवठा झाल्यानंतर त्यावर आवश्यक ती प्रक्रिया होणे आवश्यक आहे ती होत असली तरीही शहरातील अनेक भागात गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत त्यामुळे शहरवासीयांनी नळाला येणारे पाणी उकळून गाळून प्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पंचनाम्यांच्या मागणीसाठीचे पहिले आंदोलन महापालिकेवर धडकले..! शहरातील अनेक भागातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे या भागातील नुकसानीच तात्काळ पंचनामे करावेत, या मागणीसाठी आज सोमवारी महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रभाग क्रमांक तीन, नऊ आणि दहा या प्रभागातील विविध नगरातील महिलांनी धरणे आंदोलन केले. यामध्ये भाजपा ओबीसी मोर्चाच्या मराठवाडा विभाग संयोजिका महादेवी मठपती, भाजपाचे उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख, आशिष नेरलकर, सुरेखा संगमवाड, मोनिका गुट्टे, रुक्मिणी चव्हाण, संगीता मोळके, शिवानी गरजवाड, पूजा गीते, सखुबाई सोळंके, प्रीतीकौर पुजारी, राधा पवार, विजयश्री माधनवाड, कमलबाई जोगदंड, प्रेमा पवार, पल्लवी सरपाते, मालती चव्हाण, मनीषा ठाकूर आदींचा समावेश होता. या विविध नगरातील शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांना मागणीचे निवेदन सादर केले. अनेक भागातील नागरिकांनी मदत मागूनही महापालिकेची यंत्रणा वेळेवर पोहोचली नसण्याची तक्रार यावेळी करण्यात आली. उपरोक्त प्रभागातील नगरामध्ये तात्काळ पंचनामा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महादेवी मठपती यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!