
नांदेड :- जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासुन मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गढुळ पाण्याचा प्रवाह वाढला आहे. हे पाणी शुध्दीकरण करणे कठीण होत आहे. तसेच पुराच्या गढूळ पाण्यामुळे महापालिकेच्या पंपींग स्टेशन व जलशुध्दीकरण केंद्रावरील पंपींग मशिनरीमध्ये बिघाड होण्याची शक्यता असल्याने मंगळवारी शहरास होणारा पाणी पुरवठा एक दिवसासाठी बंद राहणार आहे. पाणीटंचाईमुळे पाणीपुरवठा बंद राहत होता आता पुरपरिस्थितीमुळेही ऐन पावसाळ्यात नांदेड शहरवासीयांना नळाच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नदीपात्रातील पाण्याची आवक कमी होऊन पाण्याचा विसर्ग कमी झाल्यावर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन पाण्याचा अपव्यय टाळावा, महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.