
नांदेड – जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नांदेड ते नायगाव रस्त्यावर तहसील कार्यालयाजवळ गुरुवारी गहू आणि तांदळाचे दोन वाहने पकडले. यामध्ये एका वाहनात १ लाख १० हजार रुपयांचे गहू व तांदूळ तर दुसऱ्या वाहनात ७५ हजार रुपयांचे तांदूळ सापडले आहेत. पोलिसांनी या कारवाईत दोन्ही वाहने आणि गहू, तांदूळ असा २४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यात स्वस्त धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याचे पोलीस कारवायावरून स्पष्ट होत आहे. ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत कुंटूर, अर्धापूर, देगलूर, उमरी येथे स्वस्त धान्याचे ट्रक पकडले आहेत. या कारवायामध्ये जवळपास दीड कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. असे असताना धान्याचा काळाबाजार थांबेल अशी अपेक्षा होती. मात्र हा काळाबाजार अजूनही मोठ्या प्रमाणात सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. १९ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नायगाव पोलीस ठाणे हद्दीत नांदेड ते नायगाव रस्त्यावर तहसील कार्यालयाजवळ एमएच २६ बीडी ८५१० क्रमांकाचे वाहन तपासले. त्या वाहनात तांदूळ व गव्हाचे ८० कट्टे जवळपास १ लाख १० हजार रुपयांचा हा रेशनचा संशयित माल सापडला. त्याच वेळी एमएच २६ बीई ४२४६ या क्रमांकाचे वाहन आहे तपासले. त्या वाहनामध्येही तांदळाचे ६० कट्टे याची किंमत जवळपास ७५ हजार रुपये आढळली आहेत. हे दोन्ही वाहने आणि धान्य असा एकूण २४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हे दोन्ही वाहने नायगाव ठाण्यात लावण्यात आली आहेत. या धान्य प्रकरणी पुरवठा विभागाचा अहवाल मागून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, खंडेराव धरणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एम. आरसेवार, पोतदार मुंढकर, तलवारे, येंगाले, वाघमारे यांनी पार पाडली.
जिल्हा पुरवठा अधिकारी मौनातच…जिल्हा पोलीस विभागाकडून स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बाजारात जात असताना मोठ्या प्रमाणात कारवाईचे सत्र सुरू केले आहे. असे असताना जिल्हा पुरवठा विभागाचे प्रमुख मात्र मौन बाळगून आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या काळ्या बाजाराला पुरवठा विभागाचे पाठबळ आहे की काय असाच संशय निर्माण होत आहे. जिल्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत कुंटूर, अर्धापूर, उमरी, देगलूर तसेच आता नायगाव येथेही कारवाई केली आहे. जिल्हाभरात पोलीस दलाकडून कारवाई केली जात आहे. पोलीस दलाकडून कारवाईत पकडलेले धान्य हे रेशनचे धान्य असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. असे असतानाही पुरवठा विभाग मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याचे आढळून आले आहे. अर्धापूर ठाण्यात एक गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
.